Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटलांच्या निष्ठेबाबत सहा महिन्यापूर्वीच शंका; पारकर यांचा धक्कादायक खुलासा

कैलास शिंदे : सरकारनामा ब्युरो

जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या निष्ठेबद्दल आपल्याला सहा महिन्यांपूर्वीच शंका आली होती, सत्तेचा लाभ शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना देण्या ऐवजी त्यांनी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनाच दिला, असे माझे निरीक्षण होते. माझ्या या अहवालावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असतानाच त्यांच्यासह राज्यातील आमदारांनी बंडखोरी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर (Vilas Parkar) यांनी येथे बोलताना केला.

राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर येथील विवेकानंद विद्या मंदिराच्या सभागृहात आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पारकर म्हणाले की, ज्यांना सारे शिवसैनिक ढाण्या वाघ म्हणत होते, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठीच काम केले. शिवभोजन थाळीची कंत्राटे तसेच अन्य शासकीय कामांचे कंत्राटेही त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच दिली. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी विचारही केला नाही. याबाबतची माहिती मला होती, संधी मिळेल तेव्हा गुलाबराव पाटील पक्ष सोडून जातील असे माझे निरीक्षण मी पक्षश्रेष्ठींकडे लेखी स्वरूपात दिले होते. ही शंका आल्यामुळेच मी कधीही गुलाबराव पाटलांकडे पक्ष वाढीचा किंवा कोणताही विषय घेऊन कधीही गेलो नाही असेही पारकर यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील यांच्या बद्दल शंका आल्यामुळेच जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेशाचा विषय देखील गुलाबराव पाटलांपासून लांब ठेवण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या गटात गुवाहाटी येथे गेलेले आमदार हे हिंदुत्वासाठी नाही तर त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आणि ईडीची कारवाई टाळण्यासाठी गेले आहेत. असे सांगून त्यांनी शिवसेनेची भूमिका सविस्तर मांडली.

यावेळी शिवसेनेचे रावेर तालुकाप्रमुख योगीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. रावेर तालुक्यातील सर्व शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मागेच एकजुटीने उभे आहेत असे त्यांनी सांगितले. तालुका युवा सेना प्रमुख प्रवीण पंडित आणि प्रभारी जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांनीही यावेळी आपले विचार मांडले. माजी जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे यांनी आपल्या भाषणात ईडीकडून कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची चौकशी का होत नाही? फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची आणि कार्यकर्त्यांचीच चौकशी का होते असा प्रश्न उपस्थित करून याच्या विरोधात जिल्हास्तरावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

यावेळी व्यासपीठावर पक्षाचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, जिल्हा उपसंघटक रवींद्र पवार, यावल आणि भुसावळ येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख तसेच राकेश घोरपडे, कुणाल बागरे, उत्तम सुरवाडे (भुसावळ), महिला आघाडी प्रमुख योगिता वायकोळे (रावेर), रजनी चौधरी (यावल) उपस्थित होते. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. येथील मेळाव्यास तब्बल ४ तास उशीर होऊनही मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT