BJP internal conflict Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या अंतर्गत राजकारणाला पुन्हा एकदा जोरदार धार चढली आहे. विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाल्यानंतर विवेक कोल्हे यांचा सत्कार थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभावक्षेत्रातील गणेश सहकारी साखर कारखाना परिसरात करण्यात आला.
या वेळी कोल्हे यांनी नाव न घेता विखे पाटील यांच्यावर जोरदार राजकीय फटकेबाजी करत, घायल होता हूं, तब घातक होता हूं, असा इशाराच दिल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यातील भाजप (BJP) नेतृत्वाशी आपले थेट संबंध असल्याचे सांगताना विवेक कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ‘हॉटलाइन’ असल्याचा सूचक दावा केला. कार्यकर्त्यांची कामे आता कुणीही अडवू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपमधील कोल्हे-विखे संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
अहिल्यानगरच्या राजकारणात विवेक कोल्हे (Vivek Kolhe) आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष जुना मानला जातो. दोन्ही नेते संधी मिळेल तिथे एकमेकांवर अप्रत्यक्ष वार करत असल्याचे चित्र अनेकदा दिसले आहे.
मात्र, गणेश सहकारी साखर कारखान्याची सत्ता ताब्यात घेत कोल्हे यांनी विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात दिलेला धक्का राज्यभर गाजला होता. आता विधान परिषद आमदारकीनंतर त्याच परिसरात झालेला सत्कार राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.
सत्कार कार्यक्रमात काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे, ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, भाजपचे राजेंद्र पिपाडा, विराट पुरोहित, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोमनाथ गोरे, शिवाजी गोंदकर, सुरेश थोरात यांच्यासह विविध पक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाची राजकीय चर्चा अधिक रंगली.
या वेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले, गणेशच्या लढाईत अनेक अडथळे आणले गेले. लोकशाही मार्गाने लढत असताना आर्थिक त्रास देण्याचे राजकारण होऊ नये. गणेश परिसराने माझ्यात कै. शंकरराव कोल्हे यांचे गुण असल्याची जाणीव करून दिली आणि इथूनच राजकीय क्रांती घडली. पूर्वी सत्ताधारी पक्षात होतो, आता आपणच सत्तेत आहोत.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचाही उल्लेख करत त्यांनी मोठे विधान केले. त्या निवडणुकीत जे घडले, त्याचे आज समाधान वाटते. तसे झाले नसते, तर अमित शाह यांची भेट झाली नसती. आता मला संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र म्हणून मिळाले आहे. त्यात राहाता आणि लोणीही येते, असा टोला त्यांनी लगावला.
कोल्हे यांनी जुन्या वादांनाही उजाळा दिला. निवडणुकीच्या काळात याच मैदानावर सभा घेण्यास नकार देण्यात आला होता. राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यालाही विरोध झाला. पण आज त्याच मैदानावर आमदार म्हणून सत्कार होत आहे, हा वेगळाच आनंद आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, विवेक कोल्हे यांच्या या फटकेबाजीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र संयमी भूमिका घेतली. आमच्यात आणि विवेक कोल्हे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ते आमदार झाल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक घडी मजबूत आहे. पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.