Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जळगावच्या वादात ‘भगीरथ’ एकनाथ खडसे मोठे की ‘आरोग्यदूत’ गिरीश महाजन?

Sampat Devgire

जळगाव : भारतीय जनता पक्षात (BJP) असताना आणि आताही प्रतिस्पर्धी असलेल्या दोघा ‘भाऊं’ मधील एकमेकांवरील टोकाच्या टिकेचा अंक गेल्या आठवड्यात पार पडला.. गिरीश महाजनांना (Girish Mahajan) कोरोनाची लागण झाल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) महाजनांकडून वेगवेगळी वक्तव्ये समोर आली. या राजकीय वक्तव्यांनी खरेतर जनतेची करमणूकच होते. पण, या वेळी करमणुकीपेक्षा झाला असेल तर थोडा संतापच. कुणाला कुठेही पाठविण्यापेक्षा या नेत्यांनी कुठेही न जाता विकासासाठी क्षमता अन्‌ प्रतिष्ठा पणाला लावलेलीच बरी.

एकनाथ खडसे अन्‌ गिरीश महाजन.. खरेतर दोघेही जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते. खडसे सलग ३० वर्षे आमदार होते. महाजनांचीही ही सलग सहावी टर्म. त्यामुळे खडसे सिनिअर असले तरी महाजन ज्युनिअर राहिलेले नाहीत. सिंचन प्रकल्पांचे नेटवर्क उभारणारे खडसे ‘भगीरथ’ ठरतात, तर आरोग्यातील सेवेमुळे महाजन ‘आरोग्यदूत’. त्यामुळे दोघांचे या जिल्ह्यासाठी आपापल्या परीने व क्षमतेनुसार विशेष योगदान. तीन दशकांपेक्षाही अधिक काळ हे दोघे एकाच पक्षात, भाजपत रमले होते.. १९९० ते २०१० ही दोन दशके दोघा ‘भाऊं’नी राजकीयदृष्ट्या चांगलीच गाजवली.

अर्थात, नंतरच्या काळात एकाच पक्षात असूनही दोघांमध्ये वर्चस्वाच्या मुद्यावरून मतभेद निर्माण झाले. २०१४नंतर ते वाढत गेले, २०१६मध्ये फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून खडसेंचा राजीनामा झाल्यानंतर हे मतभेद टोकाला गेले.. आता तर खडसे राष्ट्रवादीत असल्याने दोघे कट्टर वैरीच झालेत. त्यामुळे आता त्यांच्यात थेटच लढाई सुरू झालीय..

दोघांनी राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांवर काय टीका करायची, हा त्यांचा व्यक्तिगत विषय.. पण, जेव्हा त्यांची टीका पातळी सोडायला लागते तेव्हा तो समाजाचा विषय होतो.. कारण, समाजाच्या एकूणच जडणघडणीत प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे दोघा ‘भाऊं’सारख्या नेत्यांचे योगदान असते. त्यांचे समर्थक म्हणा की, कार्यकर्ते, अनुयायी म्हणा की शिष्य- भक्त.. त्यांच्या विचारांचा पगडा या मंडळीवर असतोच.. किंवा अनेकांना राजकीय नेतेही आदर्श वाटतात, त्यामुळे त्यांचेच अनुकरण बर्याचदा समाजातील काही घटक करत असतात. त्यामुळे नेत्यांमध्ये काही वाद होत असतील आणि त्याचे परिणाम अशा गंभीर वक्तव्यांपर्यंत जात असतील तर ते समाजाच्या दृष्टीने नक्कीच योग्य नाही.

महाजन म्हणाले ‘खडसेंना ठाण्याला पाठवा..’ खडसेंनी त्यावर ‘महाजनांना पुण्याच्या बुधवारपेठेत पाठवावे..’ असे प्रत्युत्तर दिले. ठाणे असो की बुधवारपेठ या भागाची एकाच मुद्यापुरती ओळख नाही.. या दोन्ही भागातील अनेक चांगली ठिकाणं त्यांचे वैशिष्ट्य व महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे कुणाला कुठेही पाठविण्याची गरज नाही, की कुणी कुठे जाण्याचीही आवश्‍यकता नाही.. ‘गिरीशभाऊंचा कोरोना लवकर बरा होवो.. त्यांची समाजाला, महाराष्ट्राला गरज आहे’ असे खडसे म्हणाले होते. पण, गिरीशभाऊच काय, नाथाभाऊंचीही महाराष्ट्राला गरज आहे.. त्यामुळे दोघांनीही एकमेकाला कुठे जाण्याचा सल्ला न देता जळगाव जिल्ह्याच्या भल्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे आपले ‘वजन’ वापरावे, अपेक्षा करण्यात गैर काय?

राजकारणात कुणी कधीही कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो.. हे या दोघा नेत्यांना सांगण न लगे.. त्यामुळे विख्यात उर्दू शायर बशीर बदर यांचा हा शेर याठिकाणी प्रस्तुत करणे योग्य वाटते..

‘दुश्‍मनी जम कर करो

लेकीन यह गुंजाईश रहे,

जब कभी हम फिर दोस्त हो जाएं

तो शर्मिंदा न हो..’

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT