Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: नाशिकमधून छगन भुजबळच का? हे आहे कारण...

Sampat Devgire

BJP Politics News: नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित आहे. हे नाव थेट दिल्लीतून ठरले आहे. त्यामागे भाजपचा एक विशिष्ट राजकीय फॉर्म्युला ठरला आहे. फक्त नावाची घोषणा लांबली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाणीवपूर्वक आपली प्रतिमा ओबीसी नेते अशी निर्माण केली आहे. त्याचे विविध राजकीय लाभ त्यांना होतात. हे राजकीय आणि सामाजिक गणित मांडूनच त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्याच भूमिकेला प्रतिसाद म्हणून भाजपने थेट दिल्लीतून त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जाते. (BJP Loksabha Politics, why Bhujbal's name declaration delayed)

छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांत वारंवार, 'मी उमेदवारी मागितलेली नाही. माझी उमेदवारी दिल्लीतून निश्चित झालेली आहे. पक्षाने सांगितले म्हणून मी उमेदवारी करणार आहे' असे स्पष्ट केले आहे. दिल्लीतून त्यांची उमेदवारी कोणी आणि का निश्चित केली? असा प्रश्न अनेक राजकीय कार्यकर्त्यांना पडला आहे.

नाशिक मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारीसाठी नकार देण्यात आला आहे. या मतदारसंघातून गोडसे यांच्या विरोधासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रचंड विरोध केला होता. घोषणाबाजी केली होती. वरिष्ठ नेत्यांकडे शिष्टमंडळ गेले होते. त्यात आघाडीवर होत्या आमदार देवयानी फरांदे. फरांदे या भुजबळ समर्थक मानल्या जातात. योगायोग म्हणजे जेव्हा गोडसे यांच्याऐवजी भुजबळ यांचे नाव निश्चित झाले, तेव्हा जागेच्या मागणीसाठी अडून बसलेले भाजपचे नेते गप्प आहेत. यातील राजकीय संदेश खूप बोलका आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्ष अतिशय विचारपूर्वक निर्णय घेत असतो. त्यामागे एक दीर्घ विचार मंथनदेखील असते. कदाचित या मंथनातूनच भाजपला ओबीसी कार्ड खेळण्याची रणनीती सुचली असावी. त्यासाठी त्यांनी माधव फॉर्म्युला पुढे आणला आहे. अर्थातच यामध्ये माळी धनगर आणि वंजारी या समाजाला जाणीवपूर्वक पुढे आणण्याचा प्रयत्न आहे.

त्यामुळेच बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde), परभणीतून महादेव जानकर आणि नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असावी. या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी राज्यातील भाजपचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल. त्या दृष्टीने पक्षाने आपला सर्व जोर या उमेदवारांसाठी लावला आहे.

मंत्री भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाशिक हा आपोआपच हाय प्रोफाइल मतदारसंघ होणार आहे. या मतदारसंघाची चर्चा राज्यभर होईल. अर्थातच त्यासाठी स्टार प्रचारकांच्या सभाही होतील. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह किंवा अन्य मोठे नेते भुजबळ यांच्यासाठी आपली शक्ती पणाला लावतील. त्यामुळे नाशिकची निवडणूक कशी होते, भुजबळ यांची उमेदवारी केव्हा जाहीर होते, याची सगळ्यांनाच मोठी उत्सुकता आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT