Minister Dada Bhuse
Minister Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse: ५० खोक्यांच्या घोषणेने दादा भुसे राजकीयदृष्या अस्वस्थ?

Sampat Devgire

नाशिक : कासारे (जि. धुळे) (Dhule) येथे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारमधील मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना शनिवारी शेतकऱ्यांच्या (Farmers) रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी भुसे यांना काळे झेंडे दाखवत संताप व्यक्त केला. तसेच भुसे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Farmers shouts anti slogan in front of Dada Bhuse)

राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधी पक्ष, शिवसेना आणि सामान्य मतदार देखील अस्वस्थ आहेत. शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडखोरी करून नवा गट स्थापन केला. तेव्हापासून याबाबत सतत टिका होत होती. त्यात दादा भुसे यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्याचा प्रत्यय काल त्यांच्या शेजारच्या मतदारसंघातच त्यांना आला. त्यामुळे राजकीय घोषणांतील ५० खोक्यांचे ओझे खरे की अफवा काहीही असले तरी ते त्यांना किती दिवस त्रास देत राहील. त्यांना अस्वस्थ करीत राहील याची चर्चा होत आहे.

नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर `५० खोके, एकदम ओक्के` या घोषणा विरोधी पक्षाच्या आमदारांनी दिल्या होत्या. तेव्हापासून या घोषणा सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अस्वस्थ करीत होत्या. त्याचे पडसाद विधामंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या आमदारांच्या झोंबाझोबीतून दिसले. मात्र थेट मतदारसंघात असे प्रकार होऊ लागल्याने त्याची झळ या बंडखोर आमदारांना निवडणुकीतही बसेल का? याची चर्चा कालच्या प्रकाराने सुरु झाली.

बंदरे व खनिकर्ममंत्री भुसे शनिवारी धुळे दौऱ्यावर होते. या वेळी कासारे (ता. साक्री) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी ते जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला. विशेष म्हणजे भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी त्यांना डावलत कांदा प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची सूचना केली.

कांद्याला भाव मिळत नाही. साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. या वेळी आंदोलकांनी ‘५० खोके, मंत्री ओके’ अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत भुसे यांना दखल घेण्यास भाग पाडले.

दरम्यान, दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक आंदोलक काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. मात्र, त्यांना मदत होताना दिसत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. शिवाय, भुसे यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी ‘५० खोके, मंत्री ओके,’ अशा घोषणा देत त्यांचा निषेध केला. या घोषणांमागे काही राजकीय अर्थ दडलेले आहेत. मतदारांत त्यातून चांगला संदेश जात नाही. त्यामुळे त्याचे राजकीय ओझे किती दिवस वागवावे लागले, याबाबत उत्सुकता आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT