Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपच्या पराभवासाठी काँग्रेस सोबत हवीच!

Sampat Devgire

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात लढण्यासाठी काँग्रेसला (Congress) सोबत ठेवावे लागेल. तसेच ज्या राज्यात काँग्रेस कमजोर आहे, तिथं स्थानिक पक्षाला काँग्रेसने सहकार्य करावे अन काँग्रेस प्रबळ असलेल्या ठिकाणी इतरांनी नमते घेणे हे सूत्र त्यासाठी उपयुक्त ठरु शकते, असे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज येथे स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाच्या सूचनेचे त्यांनी स्वागत केले. शिवाय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मानसन्मान करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की श्री. शरद पवार हे वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा देशातील राजकीय लढाईत व्हावा म्हणून युपीएच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या आग्रह धरला जात असावा. त्यासंबंधी युपीएमधील नेते इतरांचा मानसन्मान ठेऊन निर्णय घेतील. युपीएमध्ये समाविष्ट नसलेल्या राजकीय पक्षांचे नेते श्री. पवार यांच्या संपर्कात आहेत. ते युपीएमध्ये एकत्रित अथवा सोबत येऊ इच्छित असतील. त्यातून अध्यक्षपदासाठी श्री. पवार यांच्या नावाची सूचना पुढे आलेली असणार. त्यामुळे विरोधकांमध्ये एकीचे बळ एकवटल्यास देशामध्ये राजकीय बदल पाहावयास मिळेल, असे आपणाला वाटते.

कुरबुरी असल्या तरी १५ वर्षे सत्तेत

एका राजकीय पक्षाची सत्ता असली, तरीही कुरबुरी होतात. यापूर्वी दोन पक्षांचे सरकार होते, तरीही कुरबुरी होत्या. आता तीन पक्षांचे सरकार असून कुरबुरी असल्या तरीही महाविकास आघाडी १५ वर्षे राज्यात सत्तेत राहील, असा दावा श्री. भुजबळ यांनी केला. ते म्हणाले, की कोरोना महामारीतून वाचविण्यात दोन वर्षे गेली आहेत. त्यामुळे किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल. नेमणुका होतील. कामांचे निर्णय होतील. सगळे सुरळीत झाल्यावर कुणाच्याही तक्रारी राहणार नाहीत.

महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले शिवसेनेचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून कोणत्या आमदारांना किती निधी मिळाला, कोणत्या भागासाठी निधीचे काय करायचे हे नेत्यांनी सुचवायचे असे ठरले आहे. त्यानुसार काम सुरु आहे.

भाजप नेते यंत्रणांचा झालेत भाग

भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतात तशा केंद्रीय यंत्रणा हलतात. त्यामुळे कुणाला अटक होणार हे अगोदर सांगितले जाते आणि मग कारवाई होते. त्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते यंत्रणांचा भाग झालेत, असा गंभीर आरोप करून श्री. भुजबळ म्हणाले, की अनिल देशमुख या आमच्या नेत्यांना अटक झाल्याने जनतेचे, कार्यकर्त्यांचे प्रश्‍न सुटावेत म्हणून पक्षाचे नेते दौरे करत आहेत. म्हणजे त्यांच्या मतदारसंघाबद्दल चिंता वाटते असे नव्हे. यापूर्वी माझ्यावर कारवाई झाली असताना येवल्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इतर नेते येऊन गेले आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT