MLA Nitin Pawar
MLA Nitin Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

लोकांची कामे करा नाही तर बदली करून घ्या!

Sampat Devgire

कळवण : शासकीय (Government) योजनांचा लाभ ग्रामीण व आदिवासी (Trible) भागातील जनतेला मिळत नाही. ते अनभिज्ञ असल्यामुळे लाभार्थ्यांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामे करावीत. कामकाज करण्यात स्वारस्य नसेल तर बदल्या करुन घ्याव्यात, असा सल्ला आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी दिला.

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कळवण व सुरगाणा तालुक्यात ‘कृषी व महावितरण विभाग आपल्या दारी’ उपक्रम राबविण्याची सूचना कळवणचे आमदार नितीन पवार यांनी दिल्या. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यात स्वारस्य नसेल तर बदल्या करुन घेण्याचा सल्ला दिला.

कळवण- सुरगाणा तालुक्यात रस्ते आणि पूल बांधकाम करण्यासाठी अर्थसंकल्पात १३५ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून, जयदर परिसरातील बहुतांशी रस्त्यांचा यात समावेश असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. जयदर परिसरातील जनतेची मागणी लक्षात घेऊन दोन- तीन दिवसात अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून पाणी सोडण्याची सूचना आमदार पवार यांनी पुनंद प्रकल्पाच्या यंत्रणेला करुन जनतेला दिलासा दिला.

कृषी सहाय्यक, वायरमन, ग्रामसेवक, आरोग्य सेवक भागात फिरत नसल्याच्या तक्रारी आल्याने आदिवासी व दुर्गम भागात काम करण्याची यंत्रणेची मानसिकता नसेल तर त्यांनी तालुक्यातून अन्यत्र बदली करुन घेण्याचा सल्ला आमदार पवारांनी देऊन एकप्रकारे कामचुकार विभागप्रमुखांचे कान टोचले.

सुपले व सुळे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबरोबर मोऱ्याडुंब, तीळगव्हाण, उंबऱ्याबन, डोंगरी जयदर, काठरा, निमपाडा, भैताने येथील पाणीप्रश्‍नांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन परिसरात कुठेही पाणीटंचाई उद्‌भवणार नाही, याची काळजी ग्रामसेवक व तलाठ्यांनी घेण्याची सूचना आमदार पवार यांनी केली.

रमेश बागूल, लाला जाधव, रमेश महाजन, दत्तू गायकवाड, रामदास चव्हाण, संतोष गावीत, दीपक देशमुख आदींनी चर्चेत सहभाग घेऊन यंत्रणेवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. ग्रामसेवकासंदर्भात काही नागरिकांनी तक्रारी करुन बदल्या करण्याची मागणी केली.

ग्रामसेवकांच्या बदल्या करा

कळवण तालुक्याच्या आदिवासी व दुर्गम भागात अनेक वर्षांपासून ग्रामसेवक हे ठाण मांडून बसले असून ग्रामसेवक कम ठेकेदार झाले आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना उडवाउडवीचे उत्तरे देतात. गावात ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तक्रार करुन ग्रामसेवक दखल घेत नसल्याची कैफियत आदिवासी बांधवानी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकासधिकारी डॉ. नरेश पाटील, कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माजी सभापती मधुकर जाधव, युवराज गांगुर्डे, नितीन बोरसे, ज्ञानदेव पवार, लालाजी जाधव, मन्साराम ठाकरे व परिसरातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT