Mumbai News : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर झाल्यांनतर येथून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस नेते नसीम खान हे इच्छूक होते. मात्र नाराज असलेल्या नसीम खान यांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना नसीम खान यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
या भेटीनंतर नाराज झालेल्या नसीम खान (Naseem Khan) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. गुजरात, महाराष्ट्रात काँग्रेसने एकही मुस्लिम समाजातील नेत्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मी नाराज आहे. माझ्याकडे समाजातील नागरिक उमेदवारी न देण्याचे कारण विचारत आहेत. काँग्रेसच्या (congress) या भूमिकेवर मुस्लिम समाज नाराज आहे. त्यामुळेच मी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. (Naseem Khan News)
नसीम खान यांची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी दुपारी माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नसीम खान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसकडून मला उत्तर मध्य मुंबईतून तयारी करण्यास सांगितली होती. त्यानंतर मी तयारीला लागलो होतो. मात्र, अचानक काय झाले याची मला कल्पना देण्यात आलेली नाही. मला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे माझी नाराज कायम आहे, असेही यावेळी नसीम खान यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात एकही काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. मतदान मुस्लिम समाजाचे पाहिजे मग उमेदवार का नाही, असा प्रश्न समाज मला विचारत असून त्यांना मी काय सांगणार? उत्तर मध्य मुंबईत प्रचार करायचा की, नाही याचा निर्णय मी घेईल. माझी जी काही नाराजी आहे, ती मी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना कळवली असल्याचे नसीम खान यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.