Aditi Tatkare  Sarkarnama
विदर्भ

Aditi Tatkare News : महिलांसाठी आर्थिक सुरक्षा महत्त्वाची; आदिती तटकरेंनी दिले विरोधकांच्या टीकेला उत्तर

Rajesh Charpe

Nagpur News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच विरोधकांकडून महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला टार्गेट करीत टीका केली जात आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याची एकही संधी महाविकास आघाडीचे नेते सोडत नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनीसुद्धा दीड हजार रुपये देण्यापेक्षा महिलांची सुरक्षित महत्त्वाची आहे, असे सांगून लाडकी बहीण योजनेला विरोध दर्शवला होता. यावर राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महिलांसाठी आर्थिक सुरक्षा हीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही, असे सांगून अप्रत्यपक्षणे थेट पवारांच्या टीकेला उत्तर दिले. (Aditi Tatkare News)

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे महालक्ष्मी जगदंबा मंदिराचे सोमवारी आदिती तटकरे यांनी दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, महिलांची सुरक्षा हा विषय महत्त्वाचा आहे. महिलांच्या योजना राबवणे आणि महिलांना सुरक्षा प्रदान करणे हा दुसरा भाग आहे. राज्यातील महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात हे सर्वांचेच उद्दिष्ट आहे. यात राजकारण आणण्याचे कारण नाही. महाराष्ट्र सरकारने शक्ती कायदा प्रस्तावित केला होता. महाराष्ट्राच्या प्रस्तावित शक्ती कायद्याच्या बहुतांशी बाबी केंद्र सरकारच्या कायद्यात आहेत. उर्वरित बाबी आम्ही केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्यांचा लाभ दिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिला पात्र ठरतील, असेही आदिती तटकरे यांनी सांगितले. आमच्या विभागाचा अंदाज आहे की अडीच कोटी महिलांपर्यंत ही योजना विस्तारली जाईल. सुरुवातीला 31ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. सातत्याने अर्ज प्राप्त होत असल्याने मुदत वाढवण्यात आली.

दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत पंधराशे रुपयांचा लाभ पोहोचावा, असा आमचे उद्दिष्ट आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यानी अर्ज भरले होते, त्यांना जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकरच दिला जाईल. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांना ही या महिन्यात लाभ मिळेल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT