Ajit Pawar and Ravikant Tupkar
Ajit Pawar and Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

अजित दादांनी शब्द पाळला, संसदेत गाजले विदर्भातील कापूस सोयाबीन…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकांना योग्य भाव मिळावा, म्हणून अन्नत्याग आंदोलन केले होते. त्या आंदोलनाचे फलित मिळू लागले आहे, असे जाणवत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Mp Dr. Amol Kolhe) यांनी संसदेत कापूस सोयाबीनचा मुद्दा मांडत जोरदार बॅटींग केली. हा तुपकरांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा परिणाम आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी Raju Shetti) यांच्या नेतृत्वात पश्‍चिम महाराष्ट्रातल्या ऊसाला भाव मिळवून दिल्यानंतर रविकांत तुपकर यांनी विदर्भातील कापूस व सोयाबीन पिकांना भाव मिळवून देण्यासाठी लढा उभारला. त्यासाठी बुलडाण्यात एलगार मोर्चा काढण्यात आला आणि त्याच मोर्चात अन्नत्याग सत्याग्रहासोबतच तीव्र आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी नागपूरच्या संविधान चौकातून आंदोलनाला सुरुवात केली. चौथ्या दिवशी सरकारच्या वतीने मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांचे उपोषण सोडविले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुपकरांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते.

मंत्रालयात अजित दादांच्या दालनात झालेल्या बैठकीत विदर्भातील जवळपास सर्व मंत्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. तेथे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले सर्व खासदार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करतील, असा शब्द अजितदादांनी दिला होता. तशा सूचना आणि पत्रही अजित पवारांनी खासदारांना पाठविले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विदर्भातील कापूस सोयाबीनचा मुद्दा संसदेत उपस्थित उपस्थित करीत जोरदार बॅटींग केली.

दुर्लक्ष झाल्याची फडणवीसांची कबुली..

सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्‍नावर सर्व नेत्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी लढा दिला पाहिजे. लोकप्रतिनिधींचे हे कर्तव्यच आहे. तरीही या गंभीर प्रश्‍नावर विदर्भातला कुणीही नेता बोलायला तयार नाही. आमच्या आंदोलनाची दखल घेत अजित पवारांनी योग्य कार्यवाही केली. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही सविस्तर चर्चा झाल्याचे तुपकरांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली, ‘यावेळी कापूस, सोयाबीनच्या प्रश्‍नाकडे माझे दुर्लक्ष झाले’, अशी कबुली त्यांनी दिल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

विदर्भातील खासदार का बोलत नाहीत?

डॉ. अमोल कोल्हे ज्या क्षेत्राचे खासदार आहेत, तेथे कापूस आणि सोयाबीनचे पीक फार घेतले जात नाही. तरीही त्यांनी हा मुद्दा संसदेत जोरकसपणे मांडला. विदर्भात कापूस आणि सोयाबीन हे मुख्य पीक आहे. तरीही विदर्भातील एकही खासदार यावर आवाज उठवत नाही, ही शोकांतिका आहे. खरे पाहता विदर्भातील नेत्यांनी ही बाब कुणी सांगायला नको. त्यांनी स्वतःहून या विषयी आवाज उठविला पाहिजे. पण तसे होत नाही. विदर्भातील नेत्यांनी अक्षरशः लाज वाटते.

- रविकांत तुपकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT