Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar : अजित दादा म्हणाले, मुंबई-पुणे हायवे ८ लेन करा...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आठ दिवसांपूर्वी मृत्यू होतो काय आणि त्यानंतर सभागृहात आपल्याला त्यांच्यावर प्रश्‍न विचारण्याची वेळ येते, हे दुर्दैवी आहे. सरकार आपल्या परीने तात्काळ उपाययोजना करेलच पण या मार्गावरची वाहतूक बघता आता हा रोड आठ लेन करण्याची गरज आहे, विरोधी पक्षनेते अजित पवार आज सभागृहात म्हणाले.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त ट्रॅफीक मुंबई-पुणे हायवेवर आहे. हा ६ लेनचा रोड आहे. पण आता हा रोड मोठा करण्याची गरज आहे. जायला ४ लेन आणि यायला ४, असा ८ लेनचा हा मार्ग केला पाहिजे. यासाठी जागा पहिलेच अधिग्रहीत केलेली आहे. त्यावर सरकारने (State Government) तात्काळ काम सुरू करावे. या रस्त्यावर कंटेनर कुणाला घाबरत नाही. छोट्या गाड्यांना जुमानत नाही. वाहतूक शिस्त पाळत नाहीत, एका लेनमध्ये जात नाही. त्यामुळे चार लेन केल्यास दोन लेन कंटेनरकरिता आणि दोन लेन कार आणि इतर वाहनांकरिता उपलब्ध राहतील.

आमदारांच्या गाड्या अतिवेगात असतात..

हायवे असो की इतर मार्ग आमदारांच्या गाड्या अति वेगाने धावत असतात. अगदी लाख लाख रुपये दंड एकेकाला आलेला आहे. या मार्गावर कॅमेरे लागलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्यांचे लोकेशन बदलत असते. ओव्हस्पिडींगमध्ये गाडी मालकाच्या फोनवर मेमो जातो. आता यावरही सरकारने उत्तर शोधले पाहिजे. वेगमर्यादा निश्‍चित केलेली आहे. पण त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, यासाठी जनजागृती करण्याची गरज अजित पवारांना व्यक्त केली.

हद्दीची भानगड यायला नको..

एखादा अपघात झाला की, दोन पोलिस स्टेशनच्या हद्दीचा प्रश्‍न उपस्थित होतो. यामध्ये लोकांची फरफट होते. विनायक मेंटेंच्या अपघातातही रायगडची हद्द आहे की मुंबईची हद्द आहे, असा प्रश्‍न पुढे आला होता. असे होऊ नये, ज्या पोलिस स्टेशनला आधी कळविले जाते, त्यांनी आधी तेथे जावे. जाताना संबंधित पोलिस स्टेशनला कळवावे. हद्द निश्‍चित करण्याच्या भानगडीत बराच वेळ निघून जातो आणि जखमींपर्यंत वेळेत मदत पोहोचू शकत नाही. यासाठी सरकारने पोलिसांना तात्काळ सूचना द्यावा, असेही पवार म्हणाले.

वहिनींचा कॉल आला होता..

विनायक मेंटेंचा ड्रायव्हर सातत्याने जबाब बदलतोय. दर वेळी स्टेटमेंट वेगवेगळे देत आहे. त्यामुळे त्रयस्थ लोकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. या घटनेमध्ये काही काळेबेरं तर नाही, असे सवाल विचारले जात आहेत. काल मेटेंच्या पत्नीचा कॉल आला होता. त्यांना मी सांगितले की, उपमुख्यमंत्री विदर्भात आहेत, उद्या ते येणार आहेत. आपण त्यांना कॉल करून सांगा, मी पण सांगतो. या प्रकरणात चालढकल होते आहे का, कारवाई करणार आहे का, असे त्यांचे प्रश्‍न आहेत. त्यांच्या घरातील आणि महाराष्ट्रातील कुणालाही शंका राहू नये. कारण गेलेला व्यक्ती कदापि पुन्हा परत येत नाही. आता कुणावरही अशी वेळ येऊ नये, त्यासाठी निर्णय तातडीने घेतले पाहिजे. आपण आठ दिवस खूप बोलतो नंतर सगळं विसरून जातो, असं होऊ नये, असेही अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT