Amravati
Amravati  Sarkarnama
विदर्भ

अमरावती पोलिस आयुक्तांनी शहरात लागू केली संचारबंदी...

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : अमरावती शहरात काल मोर्चादरम्यान आणि आज बंददरम्यान प्रचंड हिंसा झाली. पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि जमावावर पाण्याचा माराही करावा लागला. त्यानंतरही परिस्थिती आटोक्यात येताना दिसत नसल्यामुळे संचारबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात अनेकांना पोलिसांचा ‘प्रसाद’ मिळाला.

काल आणि आज झालेल्या तोडफोडीच्या आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून आदेश देण्यात आला आहे. प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे की, अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नयेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये शिक्षा पात्र अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नेत्यांच्या आवाहनाला नाही प्रतिसाद..

सकाळी राजकमल चौकात बंदला हिंसक वळण मिळाल्यानंतर अमरावतीच्या पालकमंत्री व राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंसा न करता शांततेच्या मार्गांनी निषेध नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर परिस्थिती आता नियंत्रणात येत असल्याचे पालकमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. त्यामुळे अखेर पोलिस आयुक्तालयाकडून संचारबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

काल शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा हजार आंदोलकांनी मोर्चा काढला, पण हा मोर्चा अचानक आक्रमक झाला आणि त्यांनी दगडफेक आणि वाहनाची तोडफोड सुरू केली. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. अमरावतीत प्रचंड तणावाचे वातावरण होते. पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर रोजी उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील एक मशीद हिंदुत्ववादी संघटनांनी पाडल्याचा आरोप मुस्लिम संघटनांना केला होता. एवढेच नाही तर मशीद परिसरात असलेल्या मुस्लिमांच्या काही दुकानेदेखील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप केला होता आणि त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT