Amravati Agitation
Amravati Agitation Sarkarnama
विदर्भ

कौमी एकतेसाठी ओळखले जाते अमरावती, हा गालबोट लावण्याचा प्रयत्न...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : त्रिपुरा येथील मशीद तोडफोडीच्या घटनेचे पडसाद देश आणि महाराष्ट्रात उमटत आहेत. विदर्भाच्या अमरावतीत आज पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. आताही शहरात तणावपूर्ण स्थिती आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. लोकांनी शांतता ठेवावी, आणि सामान्य जनतेला वेठीस धरू नये, असे पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या. अमरावती जिल्हा कौमी एकतेसाठी ओळखला जातो. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, तणाव असला तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. ही घटना धक्कादायक आहे. काही लोक या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये नाहक सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. लोकांनी शांतता बाळगून हे प्रकार टाळायला हवे. अमरावती जिल्हा कौमी एकतेसाठी ओळखला जातो. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. वातावरण खराब करण्याचे काम त्वरित थांबवले पाहिजे. जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाची नजर आहे. हे घडवून आणणारे आणि करणारे, दोहोंना कठोर शासन केले जाईल. तूर्तास परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यांतून पोलिस कुमक मागविण्यात आली असल्याचेही त्या म्हणाल्या.

आज सकाळी बंदला हिंसक वळण लागले. त्यानंतर शहराचा मध्यवर्ती परिसर असलेल्या राजकमल चौकानजीक असलेल्या नमुना गल्लीमध्ये दोन गट आमने-सामने आले. त्यांतील एका गटाने शस्त्र काढली, तर दुसऱ्या गटाने दगडफेक केली. पोलिस येत असल्याची कुणकुण लागताच दोन्ही गट पसार झाले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. त्रिपुरा येथील मशीद तोडफोडीच्या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चात काही समाजकंटकांनी दगडफेक आणि तोडफोड केली होती. शनिवारी पुन्हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. पोलिसांनी लाठीमार केला. यावर भाष्य करताना गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही याचा निषेध करतो, असेही महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

नवरात्रीमध्ये बांगलादेशात दुर्गा मंडपाची मुस्लिम जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद त्रिपुरात उमटले. त्रिपुरातील घटनेचे पडसाद देश आणि महाराष्ट्रात उमटल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये काढलेल्या मोर्चातील जमावाने दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली होती. पोलिस आयुक्तांनी शांतता बाळगून घरी जाण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांना केले होते. शनिवारी बंद देखील घोषित करण्यात आला होता. परंतु, बंद दरम्यान पुन्हा हिंसा उफाळून आली. जमावाने राजकमल चौकात दगडफेक आणि तोडफोड सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने काही पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निदर्शने केली.

शहरातील नमुना परिसर, जवाहर गेट, गांधी चौक भागामध्ये फिरून किरकोळ स्वरूपात फुटपाथवर असलेल्या दुकानांची तोडफोड करण्यात आली. शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या राजकमल चौक, नमुना, जवाहर गेट, जवाहर रोड येथे असलेल्या प्रतिष्ठानात घुसण्याचा प्रयत्न जमावाने केला. यावेळी त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. आंदोलनाच्या निमित्ताने शहराच्या सर्वच चौकांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT