Amravati Congress Agitation Sarkarnama
विदर्भ

Amravati Municipal Corporation : अमरावती महानगरपालिकेवर कसला ‘पंजा’, मालमत्ता करवाढ भोवणार?

Atul Mehere

Amravati Political News : स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकमेकांना घेरण्यास सुरुवात केली आहे. अमरावतीत सोमवारी (ता. २५) महापालिकेच्या विरोधात काँग्रेसने आपला ‘पंजा’ कसण्याचा प्रयत्न केला. कारण ठरले महापालिकेने केलेली मालमत्ता करवाढ. (Amravati is considered as an important city in western Vidarbha)

पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर म्हणून अमरावतीकडे पाहिले जाते. येथील महापालिका प्रशासनाबद्दल नागरिक व राजकीय नेत्यांमध्ये नाराजी आहे. अशात महापालिकेने पाच ते सातपटीने मालमत्ता कर वाढविल्याचा आरोप करीत काँग्रेसने शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या राजकमल चौकात जोरदार आंदोलन केले. करवाढ करताना नागरिकांना तीन ते सहा पट कर वाढवून देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने या वेळी केला.

काल सकाळी काँग्रेसचे कार्यकर्ते राजकमल चौकात एकत्र आले. महापालिका प्रशासन, राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर टॅक्स पावत्यांची होळीही करण्यात आली. मालमत्ता करवाढीला तत्‍काळ स्‍थगिती द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्‍या शिष्‍टमंडळाने महापालिका आयुक्‍तांकडे केली.

मोर्चा महापालिकेवर पोहोचल्‍यानंतर महापालिका आयुक्‍त देवीदास पवार यांनी शिष्‍टमंडळासोबत चर्चा केली. शहर कॉंग्रेसचे अध्‍यक्ष बबलू शेखावत यांनी सांगितले की, शासन, प्रशासनाने लागू केलेली करवाढ चुकीची आहे. सर्वसामान्‍य जनतेला परवडणारी नाही. तत्‍कालीन आयुक्तांनी आवश्यकता नसताना केलेल्‍या खर्चाची भरपाई म्हणून करवाढ करण्‍यात आली आहे.

प्रशासनाने खर्च का केला? कशासाठी केला? याबाबतीतील कागदपत्रे जनतेपुढे जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारच्या करवाढीला आमचा विरोध आहे, असे शेखावत यांनी सांगितले. १८ वर्षांनंतर एकदम मालमत्ता करवाढ केल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शासन व प्रशासन दोघेही संगनमत करून अमरावती शहरातील जनतेचा छळ करत आहेत, असा आरोप माजी महापौर विलास इंगोले यांनी केला.

फडणवीसांनी दिली होती स्थगिती...

अमरावती महापालिकेने मालमत्ता करात वाढ केल्यानंतर त्याला प्रचंड विरोध झाला होता. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करवाढीला स्थगिती दिली होती. स्थगिती मिळताच अमरावती भाजपने शहरभर फलकबाजी करीत या निर्णयाचे श्रेय घेतले होते. अशात स्थगित करण्यात आलेल्या कराच्या वसुलीसाठी महापालिकेने नागरिकांना नोटिसा कशा पाठविल्या, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

महापालिकेत सध्या प्रशासकराज असले तरी आतापर्यंत भाजपचेच वर्चस्व होते. त्यामुळे प्रशासक तथा आयुक्त देवीदास पवार हे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या आर्थिक उधळपट्टीची वसुली करण्यासाठी नागरिकांवर कराचा बोझा टाकत असल्याचा आरोप होत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT