Nagpur, Sim Takli Sarkarnama
विदर्भ

सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना, आम्ही पाडलेल्या घरांसमोर शेकोट्या पेटवून बसलो आहो

Atul Mehere

नागपूर : गत सात ऑक्टोबरला नागपूर (Nagpur) शहरातील सीम टाकळी येथील रहिवाशांच्या घरावर बुलडोझर फिरविण्यात आला होता. न्याय मिळत नसल्याने नागरिकांनी २१ तारखेला आंदोलन केले. आंदोलनानंतर उपायुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या महिला आणि पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप अन्यायग्रस्तांनी केला आहे. सर्वत्र दिवाळी (Diwali) साजरी केली जात असताना आम्ही मात्र प्रशासनाने पाडलेल्या घरांसमोर शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत बसलो आहोत, असेही अन्यायग्रस्तांनी सांगितले.

सकाळी ११ वाजतापासून ४ वाजेपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करीत होतो. चार वाजतानंतर पोलिसांनी (Police) बळाचा वापर केला. आम्ही शांततेत बसलेलो असताना आम्हाला हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रतिकार केला असता महिला आणि पुरुषांना मारहाण केली. आम्हाला न्याय देणे तर सोडा, उलट आमच्याच विरोधात गुन्हे दाखल केले, असा आरोप सीम टाकाळी वासीयांनी केला. आंदोलन शांततेत सुरू असताना बळाचा वापर करण्याची गरज काय होती? गरिबांची घरे तर तुटलीच. त्यांना रस्त्यावर आणले. आमची बाजू घेऊन निवेदन देण्यासाठी आलेले यश गौरखेडे यांच्यासह खोट्या आरोपाखाली अनेकांना कायद्याच्या कचाट्यात पकडले, असा आरोपही नागरिकांनी केला.

आम्ही शांतच होतो : ममता चहांदे

आंदोलनानंतर आम्ही महिला आणि पुरुष मिळून उपायुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. कार्यालयात आयुक्त नव्हते. एका अधिकाऱ्याने निवेदन स्वीकारले. सर्व काही शांततेत पार पडले असताना ज्यांची नावे निवेदनात होती त्यांच्याच विरोधात पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही आंदोलन करीत असताना पोलिसांना नावे सांगत बसणार काय? ही तर दडपशाही आहे, असा आरोप सीमटाकळी येथील अन्यायग्रस्त, ममता चहांदे, योगिता बिहरा, माया गजानन उबाळे, रेणुका रामराव गायकवाड, ताराबाई गौर, दुर्गा बिरहा, अंजली इंगोले यांनी केला आहे.

पोलिसांनी केली लाथाबुक्क्यांनी मारहाण..

शांततेत आंदोलन करीत असताना पोलिसांनी बळाचा वापर सुरू केला. यश गौरखेडे यांची कॉलर पकडली. त्यामुळे परिस्थिती बिघडली. पोलिस याचीच वाट पाहत होते. पोलिसांनी महिलांना लाथाबुक्क्या हाणल्या. पोलिसाने एकीच्या छातीवर पाय ठेवला. हे सर्व महिला पोलिसांनी नव्हे तर पुरुष पोलिसांनी केले, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे.

दिवाळीचा सण सर्वत्र साजरा केला जात असताना आम्ही मात्र, पाडलेल्या घरासमोर थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून बसलो आहोत. आमची लहान मुले या घटनेने हादरली आहेत. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये. आमच्यावर तर खुद्द मायबाप सरकारनेच ही वेळ आणली आहे.

-ममता चहांदे, पीडित बेघर महिला, सीम टाकळी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT