Ashish Deshmukh
Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh News : माझी सूचना पक्षाच्या हिताची होती, नोटीस बजावली ही दुर्दैवाची बाब !

सरकारनामा ब्यूरो

Dr. Ashish Deshmukh on Congress Leaders Notice : राहुल गांधी यांनी देशभरातील ओबीसी समाजाची माफी मागावी, असे मी सुचवले होते. 'मोदी' आडनाव असलेल्या व्यक्तींचा संदर्भ देणारे राहुल गांधी यांचे विधान, त्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलेली दोन वर्षांची शिक्षा आणि त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात येणे हा त्याचा मूळ संदर्भ होता, असे कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले. (Rahul Gandhi's statement referring to persons with the surname 'Modi')

राहुल गांधींच्या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की, जणू त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. आपण या अर्थाशी सहमत आहोत की नाही, हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. माझी सूचना पक्षाच्या हिताची होती. मला एवढंच म्हणायचं होतं की, ओबीसी समाजात काँग्रेसच्या विरोधात काही भावना असतील तर माफी मागून प्रकरण संपवलं पाहिजे.

भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के ओबीसी आहेत, या वास्तवावर माझी ही सूचना आधारित आहे. काँग्रेस हा नेहमीच ओबीसींचा पाठिंबा मिळत आलेला पक्ष आहे. हा समाज दुखावला गेला असेल तर माफी मागण्यात गैर काय, असा सवाल करीत 'चौकीदार चोर हैं' प्रकरणी राहुल गांधी यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती. तसेच राफेल प्रकरणी त्यांनी मे २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती, असे डॉ. देशमुख म्हणाले.

मी त्यांना तसेच करण्यास सुचवले तर त्यात काय वावगे आहे? हा विषय संपवायला हवा, असे मला वाटले आणि मी सूचना केली. कारण मला माहीत आहे की, पक्षाला बळकट करण्यासाठी ओबीसींना पुन्हा मोठ्या प्रमाणात काँग्रेससोबत आणले पाहिजे. काँग्रेस लोकतांत्रिक पार्टी असल्याचा अभिमान बाळगणारा पक्ष आहे आणि त्याचे नेते लोकशाही पद्धतीने केलेल्या सूचनेसाठी कारणे दाखवा नोटीस बजावतात, हा एक मोठा विनोद आहे.

महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही काँग्रेसचे असंख्य ओबीसी नेते आहेत. माझा प्रश्न असा आहे, की ते ओबीसींसाठी काय करत आहेत? ते समाजाची नाराजी कमी करण्यासाठी किंवा त्यांचा योग्य वाटा त्यांना देण्यासाठी काय करत आहेत? दुर्दैवाने काहीच नाही. पक्ष एका नाजूक टप्प्यातून जात असताना, ते अद्याप पक्षांतर्गत गटबाजीत आनंद मानत आहेत. ते घराणेशाही कार्यशैलीने काँग्रेसला कमकुवत करत आहेत. त्यांचे प्रदीर्घ मौन आणि निष्क्रियता त्यांच्या अधूनमधून येणाऱ्या वक्तव्यांपेक्षा आणि कारणे दाखवा नोटीससारख्या कृतींपेक्षा जास्त बोलकी आहे.

भाजपने ओबीसींना त्यांच्याकडे वळवण्याची योजना आखली आहे आणि केंद्र आणि राज्यांमधील त्यांची सरकारे ओबीसींसाठी अनेक योजना राबवत आहेत. दुसरीकडे काँग्रेसला ओबीसींबद्दल कोणतीही चिंता वाटत नाही आणि लोकशाही मार्गाने केलेल्या व्यावहारिक सूचनेचा गैर अर्थ काढला जातो, हे वेदनादायक आहे.

एमपीसीसी अध्यक्षांशी संबंधित 'खोका' या माझ्या विधानाचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तथापि, त्याचा अर्थ काढण्याचे काम मी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांवर सोडतो. त्यांनी माझ्या सूचनेचा ज्याप्रमाणे अर्थ काढला, तसा ते या मुद्याचाही काढू शकतात.

काँग्रेसने ओबीसी (OBC) समाजाची उपेक्षा केली तर हा पक्ष अधिक अडचणीत येईल, या वास्तवाचा मी पुनरुच्चार करतो, असेही आशिष देशमुख (Ashish Deshmukh) म्हणाले. कारणे दाखवा नोटीस बजावण्यापेक्षा मी महाराष्ट्र (Maharashtra) काँग्रेसच्या (Congress) नेत्यांना सल्ला देतो की, त्यांनी आपले मन, शब्द आणि कृती ओबीसींच्या हितासाठी वापरावी ज्यामुळे आपोआप पक्षाचे हित होईल, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT