Anil Deshmukh and Dr. Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh VS Anil Dedhmukh : जर ‘तेथे’ मी लढलो असतो, तर तेव्हाच काकांची जमानत जप्त झाली असती..!

Dr. Ashish Deshmukh : राजकीय वातावरण तापवून त्यांनी जनतेचे नुकसान करू नये. हे वडीलधारी मंडळींना शोभत नाही.

Atul Mehere

Ashish Deshmukh VS Anil Dedhmukh : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काटोल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन ७ फेब्रुवारीला पार पडले. या भूमिपूजनाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार अनिल देशमुख यांनी माजी आमदार, भाजप नेते डॉ. आशिष देशमुख यांच्यासोबत विनाकारण वाद घातला. त्यांना आशिष देशमुख यांनी तेथेच जोरदार प्रत्युत्तर दिले.

डॉ. आशिष देशमुख हे २०१४ मध्ये काटोल विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले. मग २०१९ ची निवडणूक ते काटोलमधून का लढले नाहीत, असा खोचक प्रश्न विचारून अनिल देशमुख यांनी वाद घातला होता. त्यावर डॉ. आशिष देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, जर मी काटोल येथून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढलो असतो, तर काकांची जमानत तेव्हाच जप्त झाली असती. काटोल क्षेत्रातील संपूर्ण जनतेला आणि राज्याला हे माहीत आहे.

काटोल येथे जनमानसात सर्वेक्षण केल्यास जनता हेच सांगेल. ही वास्तविकता त्यांनी समजावून घ्यायला हवी होती. मोठेपणा दाखवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या बोलण्याचे मला वाईट वाटत नाही कारण त्यांच्या बोलण्यातून निराशा स्पष्टपणे जाणवत होती. सध्याचे दिवस हे काकांचे नव्हे तर पुतण्यांचे आहेत. घड्याळाचेच उदाहरण घ्या. पुतण्यांचे दिवस भविष्यात अजून चांगले होतील, यात शंका नाही. अनिल देशमुख काकांनी परवा (ता. 7) जो गोंधळ घातला तो त्यांना शोभणारा नाही. गेले २५ वर्षे सत्तेत असताना ते साधे पट्टेदेखील वाटू शकले नाहीत, घरकुल देऊ शकले नाहीत.

या भागातील युवक-युवतींच्या रोजगाराचा प्रश्न आहे. माझ्या आमदारकीच्या काळात काटोल एमआयडीसीमध्ये ६४२ हेक्टर नवीन जागा घेतली गेली. तिथे अजून रस्ते नाहीत, लाइट नाही, पाण्याची सोय नाही; मग उद्योगधंदे कसे येतील? काटोल एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे येऊन या क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून मी आमदार असताना आणि नसतानासुद्धा प्रामाणिक प्रयत्न केले. रामदेवबाबांना आणून त्यांच्या पतंजली प्रकल्पासाठी प्रयत्न केले. हिंगणा येथे महिंद्राचा ट्रॅक्टर प्रकल्प आहे, भोपाळला आयशरचा ट्रॅक्टर कारखाना आहे. त्यांना लागणारे लहान-सहान पार्ट्स तयार करण्यासाठी अॅन्सिलरी युनिट सुरू करता यावे म्हणून प्रयत्न केले.

आनंद महिंद्रा यांना वरळी येथे भेटलो. पंकज गोयंका यांची भेट घेतली. ‘ऑटो हब’साठी मी नितांत प्रयत्न केले. ‘गेल’ची गॅस पाइपलाइन नरखेड तालुक्यातील पिपळा डाकबंगलावरून जाणार आहे. या पाइपलाइनच्या आधारे इफ्काेच्या माध्यमातून इंटिग्रेटेड फर्टिलायझर प्लांट आणावा म्हणून मी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आणि दिलीप संघानी यांना भेटलो, त्यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना कमी भावात युरिया मिळावा आणि स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळावा, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. अनिल देशमुख काका काहीच करू शकले नाहीत. मी करतोय, म्हणून ते चिडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काकांना जनतेने वारंवार आमदार म्हणून निवडून दिले, वारंवार संधी दिली. त्यांनी दीर्घकाळ मंत्रिपद भोगले. त्यामुळे जनतेची सार्थ अपेक्षा आहे की, या भागाचा विकास व्हावा. स्थानिक लोकांना विचारा की, त्यांनी या क्षेत्रासाठी एखादे काम केले आहे का? त्यांनी काहीही कामे केली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जर मी जनतेच्या कामांसाठी आणि या क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेत असेल तर राजकीय वातावरण तापवून त्यांनी जनतेचे नुकसान करू नये. हे वडीलधारी मंडळींना शोभत नाही, असा टोलाही डॉ. आशिष देशमुख यांनी लगावला.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT