bacchu kadu | ravi rana | navneet rana sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : नवनीत राणांचा पराभव कुणामुळे झाला अन् रवी राणा कुणामुळे पडणार? बच्चू कडूंनी सांगितलं; शेरोशायरीतून केलं घायाळ

Akshay Sabale

माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना तोडपाणीबहाद्दर, ढोंगी, ब्लॅकमेलर आणि नाटकीबाज म्हणत वाभाडे काढले होते. आता बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यासह रवी राणा यांचा शेरोशायरी आणि विदर्भातील भाषेत समाचार घेतला आहे.

"तुमची आमची बरोबर करण्याची कुठलीही औकात नाही. आपल्या जिल्ह्यात एखादं बावळट पोट्टे आहे म्हणून सोडून द्या," असा हल्लाबोल बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी राणा दाम्पत्यावर केला आहे. ते अचलपूर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, "काल आलतू-फालतू कुणी बोलले, किस गली की खसखस हैं वो... और कहां से आये हैं वो... आग लग गयी है... धुवां उडने वाला हैं... धुवां से कोई मतलब नही होता हैं... अजूल-फिजूलवर लक्ष द्यायचं नाही. दोघांना असे बाजूला करू की परत दिसणार सुद्धा नाहीत. पहिल्यांदा रवी राणा बोंबलत होते म्हणून नवनीत राणा पडल्या. आता नवनीत राणा ( Navneet Rana ) बोंबलत आहेत, म्हणून रवी राणा पडतील."

"मागील वेळी एक आमदार जास्त घेऊन येईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर राजकुमार बडोले यांना निवडून आणलं. यंदा 10 आमदार घेऊन येणार आणि अचलपूरमधून सरकार चालणार," असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

"तुम्ही ( राणा दाम्पत्य ) नावापुरते देवाचं नाव घेता. 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढताना एकदाही प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं नाही. मात्र, बापजाद्यांनी जेवढं नाव घेतलं नव्हतं, तेवढं तुम्ही प्रभू रामाचं नाव निवडणुकीत मतांसाठी घेतलं. तुम्ही काय आम्हाला भगवा शिकवणार... छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा सगळ्या धर्माला न्याय देणार होता," असं सांगत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला फटकारलं आहे.

"तुम्ही आम्हाला नौटंकीबाज म्हणता. पण, तुम्ही दोघांनी अख्ख्या जिल्ह्याची वाट लावली आहे. विकासाबाबत बोलायचं असे, तर एक स्टेजवर आमने-सामने या.. राणा कुठून आले सा***** मला समजत नाही," अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे.

"आम्ही कामाच्या आधारावर राजकारण करतो. धर्म आणि जातीच्या आधारावर राजकारण करणे आमच्या स्वभावात नाही. आम्ही कोणाच्या पाठिंबा घेत नाही. दिला तरी घेत नाही. उलट आम्ही झेंडा रोवल्याशिवाय शांत बसत नाही. ही आमची भूमिका आतापर्यंत राहिली आहे. बच्चू कडू स्वत:च्या ताकदीवर निवडून आला आहे. तुमची आमची बरोबरी करण्याची औकात नाही. आपल्या जिल्ह्यात एखादं बावळट पोट्टे आहे, म्हणून सोडून द्या," अशा शब्दांत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला फटकारलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT