Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू मैदानात, आज उधळणार बॅंकेची लिलाव प्रक्रिया !

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu in Nagpur : शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्‍नांवर प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू नेहमीच आक्रमक असतात. जगावेगळी आंदोलने करून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता जिल्हा बॅंकेच्या प्रशासकांनी शेतकऱ्यांची संपत्ती लिलावात काढण्याची नोटीस दिली. त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

आज ११ वाजता बच्चू कडू नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर धडकणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांसह शेतकरीही त्यांच्यासोबत असणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी बच्चू कडूंना यासंदर्भात निवेदन दिले होते. तेव्हाच त्यांनी जिल्हा बॅंकेची लिलाव प्रक्रिया उधळून लावण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे आज ११.३० वाजता ते जिल्हा बॅंकेवर धडक देणार आहेत.

अवसायानात निघालेल्या जिल्हा बॅंकेवरील प्रशासकांनी कर्ज वसुलीसाठी थेट शेतकऱ्यांच्या संपत्ती लिलावाच्या नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांची याविषयावर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बच्चू कडू स्टाईलने लिलावाची ही प्रक्रिया उधळून लावण्याचे ठरवण्यात आले.

आज होणाऱ्या लिलावाच्या प्रक्रियेदरम्यान संघर्ष होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. नागपूर, वर्धा तसेच बुलढाणा जिल्हा बॅंक थकीत कर्जाची वसुली तसेच अनागोंदी कर्ज वितरण प्रक्रियेमुळे अडचणीत आल्या होत्या. राज्य सरकारने या तीनही बॅंका अवसायानात आल्याचे जाहीर करीत त्यांचे व्यवहार थांबविले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यानंतर बॅंकांच्या व्यवहाराला काही अंशी परवानगी देण्यात आली.

या काळात बॅंकेच्या थकीत कर्जदाराकडून वसुलीचे काम हाती घेण्यात आले. आता थकीत कर्जदारांना नोटीस बजावत प्रशासकांनी त्यांच्या मालमत्ता लिलावाची तारीख जाहीर केली आहे. आज जिल्ह्यातील तब्बल ३०० शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तशा नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कै. वेणूबाई बाबूराव पाचपोहर (रा.मसोरा, ता. नरखेड, जि. नागपूर) यांचाही समावेश आहे. त्यांच्या संपत्ती लिलावाबाबत नोटीस बजावली गेली आहे.

वेणूबाईंचे नातेवाईक सागर वामनराव पाचपोहर यांनी आज यासंदर्भात आमदार बच्चू कडू Bacchu Kadu) यांची नागपुरात (Nagpur) भेट घेतली होती. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) सन्मान योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. त्यानंतरच्या काळात हे पोर्टल बंद करण्यात आले. कोरोना काळात हा विषय पुन्हा मागे पडला. आता बॅंकेने थेट लिलाव करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्यांच्या अडचणी वाढणार आहेत. परिणामी कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी पाचपोहर कुटुंबीयांनी आमदार कडू यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT