Mahadev Jankar and Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu News : बच्चू कडू पुन्हा उखडले; म्हणाले, भाजप वापरल्यानंतर फेकून देणारा पक्ष !

जयेश विनायकराव गावंडे

Bacchu Kadu News : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसंच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या घटकपक्षांमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरू झालं आहे. भाजपकडून मित्र पक्षांचा वापर करून फेकून देण्यात येते, असा आरोप करणाऱ्या महादेव जानकर यांच्या या वक्तव्याला आता बच्चू कडू यांनीही पाठिंबा दिला आहे. एवढ्यावरच न थांबता बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राजकीय पक्ष आणि आघाड्यांकडून मोर्चेबांधणी करण्याला वेग आला आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी असणारे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुन्हा भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. निवडणुकीपूर्वीच गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू भाजपचा समाचार घेताना दिसत आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्याला बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू भाजपवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजप मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष असल्याचं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी केल्यानंतर बच्चू कडू यांनी या विधानाला पाठिंबा दिला आहे. एकप्रकारे महादेव जानकरांच्या या वक्तव्याचं आमदार बच्चू कडूंनीही समर्थन केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्यालाही भाजपचा असाच अनुभव येत असल्याचं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही बच्चू कडू यांनी भाजपच्या विरोधात अनेकदा विधाने केली आहे. भाजपची भूमिका म्हणजे, मित्र पक्षांना सोबत घ्यायचं आणि काम झालं की सोडून द्यायचं. भाजपची जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत सहन करू, असेही बच्चू कडू म्हणाले. तर बच्चू कडू यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. कडू म्हणाले, भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे अधिक आहेत.

तर अमरावतीवर आमचा दावा..

जागावाटपावरून महायुतीत चर्चा सुरू असताना आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर प्रहारचा दावा असल्याचं म्हटलं आहे. पक्षाकडे पाच-सहा उमेदवारांचा पर्याय असल्याचंही बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे. तर नवनीत राणांना उमेदवारी द्यायच्या मुद्द्यावर कार्यकर्तेच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपचा घेतला समाचार..

यापूर्वीही अनेकदा बच्चू कडू यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मित्रपक्षातील नाराजी उफाळून बाहेर येताना दिसत आहे. महादेव जानकर यांनी भाजपवर बोलताना, 'आमच्यापेक्षा मोठी माणसं आल्यामुळे छोट्या माणसांची गरज राहत नाही. भाजप आणि काँग्रेस नेत्यांचा वापर केल्यावर काढून फेकतात’, असं जानकर म्हणाले होते. तर बच्चू कडू हे अधूनमधून भाजपवर टीका करताना दिसतात. आजही पुन्हा एकदा त्यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडू धमाका करणार का, अशी चर्चाही या निमित्ताने आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT