Bacchu Kadu on BJP. Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : कडूंचा भाजपवर सणसणीत ‘प्रहार’, म्हणाले काड्या करणे बंद करा!

Amar Ghatare

Bacchu Kadu : लहान पक्षांना संपविण्याची भाषा केल्यावरून प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच सणसणीत प्रहार केला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपण सर्व महायुतीत आहोत. त्यामुळे जरा काड्या करणे बंद करा, असा इशारा आमदार कडू यांनी भाजप आणि फडणवीस यांना दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने आमदार बच्चू कडू भाजप आणि सरकारच्या विरोधात बोलत असल्याने सर्व काही व्यवस्थित आहे ना, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

अमरावतीमध्ये बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, प्रत्येक पक्षाचे आपले एक धोरण असते. राजकीय दृष्टीकोन असतो. परंतु भाजप जर असे राजकारण करीत असेल तर त्यांनी आमचा पक्ष फोडून दाखवावा. आम्ही त्यांचा फोडू. मग कळेल कोणात किती दम आहे ते. फडणवीसांबाबत बोलताना कडू म्हणाले की, आम्ही शिवसेनेसोबत आहोत. शिवसेना सरकारमध्ये आहे. याचा अर्थ आम्ही सरकारमध्येच आहोत. तुमच्या सोबत आहोत. तुमच्या मित्रपक्षाचे आम्ही मित्र आहोत. हे माहिती आहे, तर मग काड्या करणे कमी करा. कडू यांनी वापरलेल्या या भाषेमुळे त्यांच्यात आणि फडणवीसांमध्ये नक्कीच काही तरी बिनसल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाबाबत बोलताला बच्चू कडू म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड प्रामाणिकपणे मेहनत केली आहे. त्यांची लढाई अद्यापही सुरूच आहे. या लढ्याला जाणीवपूर्वक वेगळे वळण लागावे, अशी काही लोकोची इच्छा आहे. ते त्यादृष्टीने काम करीत आहेत. त्याला जरांगे यांनी व मराठा समाजाने बळी पडू नये एवढी अपेक्षा आहे. आंदोलनाची दिशा आता बदलली तर ते चुकीचे होईल. आपण मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यासोबत आहोत. मराठा आरक्षणाच्याबाबत आता मनोज जरांगे पाटील यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.

बरेचदा मराठा आरक्षण यावर बोलताना समाजाच्याबाबत मनेाज जरांगे पाटील काही निर्णय घेतात. जरांगे यांनी अर्धवट माहिती घेऊन जर पाऊल उचलले तर त्याचा परिणाम समाजावर पडेल. मराठा आरक्षण महत्त्वाचे आहे, परंतु जरांगे यांनी टोकाची भूमिका घेऊन आपला जीवही धोक्यात घालू नये. जरांगे यांचा जीवही महत्त्वाचा आहे. मराठा समाजाचे आंदोलन जीव घेण्यासाठी किंवा देण्यासाठी उभे केलेले नाही. आपणही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही आहोत. त्यामुळे या पेचातून मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न करू. घेतलेली टोकाची भूमिका जरांगे पाटलांनी थांबवावी, असेही कडू म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT