Bachchu Kadu, Manoj Jarange Patil Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : बच्चूभाऊंनी वाढवलं महायुतीचं टेन्शन, नव्या राजकीय समीकरणासाठी मनोज जरांगेंना आमंत्रण

Jagdish Patil

Nagpur News, 28 July : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्य मित्र पक्षांना सांभाळून घेण्यासाठी मोठी कसरत करत आहे. जागा वाटपावरुन दोन्ही बाजूला चांगला पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे.

अशातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यामुळे महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली आहे. येत्या विधानसभेला आपण तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी करणार असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तसंच त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतची मोठं विधान केलं आहे.

9 ऑगस्टला भूमिका स्पष्ट करणार

एका माध्यमाशी बोलताना बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत आमची तिसरी आघाडी नव्हे तर शेतकऱ्यांची आघाडी असणार आहे. शेतकरी कष्ट करून जगतात त्यांची आघाडी करून आम्ही लढा देणार आहोत. तसंच 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये आमचा एक मोर्चा काढणार आहोत. या मोर्चामध्ये आमच्या काही मागण्या सरकारपुढे मांडणार असून 2 ते 3 लाख लोकं या मोर्चात सहभागी होतील, यावेळी आमची पुढील भूमिका स्पष्ट करणार," असं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांची आघाडी

यावेळी त्यांनी तिसरी आघाडी नव्हे तर शेतकऱ्यांची आघाडी असा शब्द वापरणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "तिसरी आघाडी म्हणजे अनेक पक्ष एकत्र येऊन फक्त जागावाटपाची देवाणघेवाण करतात. मात्र, शेतकरी आघाडीत जागावाटपापेक्षा मुद्द्यांना महत्व असेल. ती फक्त शेतकऱ्यांची आघाडी असेल, त्यामुळे आम्ही तिसरी आघाडी असा शब्द वापरणार नाही आणि कोणाला वापरू देणार नाही."

मनोज जरांगेंसाठी आमचे दरवाचे उघडे

यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासाठी शेतकरी आघाडीचे दरवाजे उघडी असतील असं देखील म्हटलं आहे. राज्यात जातीय तेढ वाढू नये यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढल्यास काहीच हरकत नाही. ते आरक्षणाचा मुद्दा घेऊन लढणार आहेत. यात काहीच वाईट नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या आघाडीचे दरवाचे मनोज जरांगेंसाठी उघडे असतील.

आम्ही भेदभाव करत नाहीत. मात्र, शेतकऱ्यांच्या आघाडीत आरक्षणाचा मुद्दा मांडणार की नाही याबाबतची भूमिका 9 तारखेला जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता खरंच कडू यांच्या आघाडीत मनोज जरांगे सामील होणार का आणि झालेच तर त्याचा राज्यातील राजकारणावर काय परिणाम होणार याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT