Bachchu Kadu Vs Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu Vs Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, उचलायला पाच ते सहा आमदार पुरेसं; बच्चू कडूंचा प्रहार

Pradeep Pendhare

Mumbai News : आमदार बच्चू कडू कधी काय भूमिका आणि निर्णय घेतील, याचा नेम नाही. कधी ते सरकारच्या बाजूने, तर विरोधात असतात. कधी म्हणतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यावर बघू. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर, तर कधी त्यांच्यावर जहरी टीका करतात. सत्तेतून बाहेर पडण्याची देखील भाषा करतात.

बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकरी मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. "शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले नाहीत, तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू आणि समुद्राच्या पाण्यात टाकू", असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

महायुतीत सत्तेत सहभागी असलेले विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू यांची संघटना प्रहार स्वतंत्र चाचपणी करत आहेत. यातून ते सत्ताधाऱ्यांना अंगावर घेत आहेत. तसंच ते विरोधकांना देखील डिवचत आहेत. यातून दोन्ही बाजूने चाचपणी करत आहेत. सर्वसामान्यांना कामाचा कोण हे देखील सांगताना बच्चू कडू पाहयला मिळतात. कळमनुरी इथं झालेल्या शेतकरी (Farmer) मेळाव्यात बच्चू कडू यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

बच्चू कडू म्हणाले, "आम्ही सर्व सामान्यांची कामे करतो. ही कामे अशीच करून घ्यायची असेल, तर प्रहारचे सर्वाधिक आमदार विधानसभेत पाठवा. आगामी विधानसभा निवडणुकीत किमान 20 आमदार प्रहारचे निवडून आले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांचे निर्णय घेणे सोपे होईल. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शेतीमालापासून ते त्यांच्या बांधावरील विजेच्या प्रश्नापर्यंत अनेक प्रश्नांकडे सत्ताधारी सोयीने पाहत आहेत". मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय न घेतल्यास त्यांचा आम्ही गणपती करू. समुद्राच्या पाण्यात टाकू. कारण मुख्यमंत्र्यांना उचलायला, तर पाच ते सहा आमदार पाहिजे ना.., असा टीकेचा प्रहार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार गेले. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले बच्चू कडू यांनी सत्तेत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे सत्तेत राहून बच्चू कडू नेहमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. लोकसभा निवडणुकीत काहीशी मागे राहिलेली प्रहार संघटना आता विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक होताना दिसते. सत्ताधारी, विरोधक आणि मतदारांना चुचकारण्याचा बच्चू कडू यांचा प्रकाराला कोण किती प्रतिसाद देतो, हे पाहण्यासारखे राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT