Ravi Rana on Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Amravati : उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी बाळासाहेबांचे विचार विकले, कोणी केला असा घणाघात

Amar Ghatare

Ram Mandir : राम मंदिराच्या निर्माण कार्यात किंवा अयोध्येतील विवादित ढाचा पाडण्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची कोणतीही भूमिका नव्हती. हिंदुत्वासाठी या दोघांनी केलेच काय, असा सवाल युवा स्वाभिमान पार्टीचे नेते तथा बडनेरा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी उपस्थित केला.

अमरावती येथे बुधवारी (ता. 3) त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राणा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार विकले आहेत. त्यामुळे त्यांना या विषयावर बोलण्याचा कोणताही हक्क नाही. वादग्रस्त ढाचा पाडण्यासाठी हे दोघेही गेले नव्हते. त्यांनी अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी देखील कोणतेही योगदान दिलेले नाही.

हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी व्यक्तीश: दिलेल्या योगदानावर आधी बोलायला हवे. श्रीराम मंदिरासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली आहे. अयोध्येत कारसेवा झाली, त्यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे कुठे होते? त्यांनी आंदोलनात सहभाग का घेतला नाही, असा प्रश्नही आमदार राणा यांनी दोन्ही नेत्यांना विचारला.

खासदार संजय राऊत यांची परिस्थिती तर अशी आहे की ते स्वत:च्या बळावर कोणत्याही निवडणुकीत विजयी होऊ शकत नाहीत. लोकांमध्ये त्यांना कवडीची किंमत नाही. त्यामुळे त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व पदारात पाडून घेतले आहे. उद्धव ठाकरे यांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. ते आधी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसले मग मागच्या दारांची विधान परिषदेचे आमदार झालेत. विधानसभा निवडणूक लढले असते आणि त्यात पराभूत झाले असते तर नामुष्की ओढवली असती. ही भिती त्यांच्या मनात होती. त्यामुळेच ते सार्वजनिक निवडणूक लढले नाहीत, अशी टीकाही आमदार रवी राणा यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच हिंदुत्वाला विरोध केला आहे. बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत त्यांनी कधीच या पक्षांशी हात मिळविला नाही. मात्र सत्तेसासाठी लाचारी पत्करत उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत जाऊन बसले. इतकेच नव्हते तर त्यांनी त्यांच्या नावाने शपथाही घेतल्याची तीव्र टीका आमदार रवी राणा यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान ‘मातोश्री’ बाहेर त्यांनी हनुमान चालिसा पठण करीत आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यांना याप्रकरणी अटकही करण्यात आली होती.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT