Balasaheb Thorat Sarkarnama
विदर्भ

Balasaheb Thorat : खरं सांगतो...! ‘त्या’ वेळेस परीक्षेपेक्षा जास्त टेन्शन असतं, असं का म्हणाले बाळासाहेब थोरात?

Atul Mehere

Politics of Maharashtra : अधिवेशनामध्ये सभागृहात सदस्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देणे अवघड असते, असे नाही. पण त्यासाठी पूर्ण अभ्यास करून जावं लागतं आणि यामुळेच कोणताही मंत्री प्रगल्भ होत जातो. अधिकाऱ्यांच्या बैठकांमुळे त्या खात्याची ओळख होते, इत्थंभूत अभ्यास होतो, असे काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी आज (ता. १९) ‘सकाळ’ नागपूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. ते म्हणाले, सभागृहात सदस्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देताना परीक्षेपेक्षा जास्त टेन्शन असतं. कॉंग्रेसच्या सद्यःस्थितीवर भाष्य करताना त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

लोकांमध्ये वज्रमूठ कायम...

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा विविध कारणांमुळे सर्व जिल्ह्यांत होऊ शकल्या नाहीत. काही नेत्यांची वज्रमूठ कायम नसली तरी तरी लोकांमध्ये वज्रमूठ कायम आहे. कॉंग्रेसचे सर्व नेते एकदिलाने एकत्र आले तर विजय अवघड नाही, पण तसे होत नाही. यावर थोरात म्हणाले, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. थोडेफार वाद आणि मतभेद, कुरबुरी सर्वच पक्षांत असतात. मात्र सध्या महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.

...तर लोकशाही धोक्यात येईल !

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास लोकशाहीच धोक्यात येईल, याची जाणीव सर्वांना झाली आहे. सुज्ञ मतदारांनीही भाजपचे मनसुबे ओळखले असल्याचे थोरात यांनी सांगितले. प्रारंभी सकाळचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी थोरात यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांची त्यांना माहिती दिली. यावेळी संदेश सिंगलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

काँग्रेस प्रचारात कमी पडली...

भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी जात, धर्माचा सोपा मार्ग निवडला आहे. अयोध्येतील राम मंदिराचे उद्‍घाटन हासुद्धा भाजपच्या प्रचाराचा आणि निवडणुकीचाच भाग आहे. काँग्रेस सुमारे साठ वर्षे सत्तेत होती. मात्र आपले तत्त्वज्ञान, विचारधारा लोकांना पटवून द्यायला आम्ही कमी पडलो, याची कबुली यावेळी थोरातांनी दिली.

प्रतिक्रांतीला सुरुवात...

बुद्ध, सनातनी असा बदल आपल्या देशात सातत्याने झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. आरक्षणाच्या माध्यमातून शोषित, दलितांना मुख्य प्रवाहात आणले. समाजात मोठी सुधारणा करण्याची क्रांती केली. आता केंद्रात भाजपची सत्ता आली तेव्हापासून टप्प्याटप्प्याने प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकशाहीचे केंद्रीकरण केले जात आहे. दीडशे खासदारांना निलंबित करून महत्त्वाचे कायदे संसदेत मंजूर करून घेतले जात आहेत, हे प्रतिक्रांतीची लक्षणे आहेत. एकाच पक्षाची सत्ता देशात राहावी, या दिशेने भाजपने वाटचाल सुरू केली आहे. हे लोकशाही आणि संपूर्ण भारतीयांसाठी धोक्याचे असल्याचा इशारा यावेळी थोरात यांनी दिला.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT