Chandrashekhar Bawankule and Rahul Gandhi
Chandrashekhar Bawankule and Rahul Gandhi Sarkarnama
विदर्भ

बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी महाराष्ट्रात असताना त्यांचे ५०० लोक आमच्याकडे आले...

Atul Mehere

नागपूर : कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा १४ दिवस महाराष्ट्रात होती. या यात्रेने महाराष्ट्रात कॉंग्रेसचा चांगला माहौल तयार केला. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेही या यात्रेची धास्ती घेतल्याचे सांगितले जात होते. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारले असता, असे काहीही घडलेले नाही. उलट राहुल गांधी महाराष्ट्रात असताना त्यांचे ५०० लोक आमच्या पक्षात आल्याचे ते म्हणाले.

गुजरातमध्ये (Gujrat) प्रचार करून आज नागपुरात परत आले असता विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यपाल कोश्‍यारींच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) वक्तव्याबद्दल विचारले असता, राज्यपाल ज्या दिवशीपासून महाराष्ट्रात आले, तेव्हापासून शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्यावर ते गेले. शिवरायांच्या बाबतीत जे विषय आतापर्यंत आले, त्यामध्ये त्यांनी संवेदनशिलपणे काम केले आहे.

त्यांच्या रोजच्या बोलण्यामध्ये, भाषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. ज्यांनी कधीही इतिहासाला आणि शिवरायांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपचा कुठलाही कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन काम करतो. जगात त्यांचे स्थान कमी करू शकत नाहीत. पण ज्या दिवशी राज्यपालांनी ते वक्तव्य केले. त्या दिवशी शरद पवार, नितीन गडकरीसुद्धा त्या मंचावर होते. या नेत्यांचा गौरव करण्याचा त्यांचा हेतू होता. पण महाराजांना कमी लेखण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

सद्यःस्थितीत आमचे संख्याबळ १६४ आहे आणि आगामी काळात ते १८४ होईल. त्यामुळे संजय राऊतांना आता यावर अधिक काही बोलू नये. आमचे सरकार स्थिर आहे. सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नाही. उलट दररोज आमचे संख्याबळ वाढत चालले आहे. नवनवीन प्रवेश आमच्याकडे होत आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना ५००च्या वर लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश घेतले. यामध्ये जिल्हा परिषद पातळीवरच्या नेते, काही माजी आमदार आणि नगरसेवकांचा समावेश आहे. आमचे सरकार दररोज चांगले निर्णय घेत आहे आणि जनतेला दिलासा देत आहे, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती करून मुंबईत भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याबाबत विचारले असता, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर तयार झालेली शिवसेना आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून तयार केलेल्या शिवसेनेला मूठमाती देण्याचे काम सद्यःस्थितीत सुरू आहे. आपला पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आता काहीही करू शकतात. उद्या ते समाजवादी पार्टी, अबू आझमी किंवा असदुद्दीन ओवेसींसोबत बैठका घेऊन युती करू शकतात. मताच्या राजकारणासाठी ते आता कुठल्याही पातळीला जाऊ शकतात, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT