Bhavana Gawali on Amrut Scheme. Sarkarnama
विदर्भ

Parliament Winter Session : लोकसभेत यामुळे दिसला भावना गवळींचा संताप...

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal : केंद्र व राज्य सरकारच्या 302 कोटींच्या अमृत योजनेचा यवतमाळात फज्जा उडाला आहे. आजही नागरीकांना सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये सर्वत्र संताप आहे. अमृत योजनेत झालेल्या गैरप्रकारावरुन बुधवारी (ता. 21) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत संताप व्यक्त केला. यवतमाळातील अमृत योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

जीवन प्राधिकरणाने तत्काळ अमृत योजनेचे काम पूर्ण करून घ्यावे, यासाठी लोकप्रतिनिधी वारंवार सूचना केल्या. नागरीकांनी आंदोलन केले. मात्र अमृत योजना पूर्ण झाली नाही. हा सर्व प्रकार संतापजनक आहे. यापूर्वीच आपण संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्यानुसार आदेश निघाले होते. मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही, असेही गवळी म्हणाल्या.

2019 मध्ये अमृत योजना पूर्ण करायची होती. मात्र ती अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे नागरीकांच्या मनातील संताप वाढत आहे, असे भावना गवळी यांनी लोकसभेत सांगितले. केंद्र तसेच राज्य सरकारने योजनेसाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत. त्यानंतरही ही योजना अपूर्ण का राहते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अमृत योजनेत 50 टक्के निधी केंद्र सरकारचा असल्यामुळे समिती पाठवून कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी लोकसभेत केली.

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात नागरीकांचा पाण्यासाठी भटकंती करावी लागली. आतही आठ दिवसआड पाण्याचा पुरवठा सुरू आहे.अनेक भागात 12 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अमृत योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे त्यामुळे स्पष्ट दिसून येते. मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जनतेचा जीवच धोक्यात आला आहे. निकृष्ट कामामुळे पाच वेळा जलवाहिनी फुटली. 28 किलोमीटरची जलवाहिनी बदलवावी लागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भविष्यातही जलवाहिनी फुटून यवतमाळकरांना धोका होऊ शकतो. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी झालीच पाहिजेख् असे गवळी म्हणाल्या. केवळ चौकशीच नको, तर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईही करावी, असे त्यांनी नमूद केले. या प्रश्नावर उत्तर देताना राज्य सरकारकडून माहिती घेण्यात येईल. चौकशीनुसार कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली.

कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे तीन वर्ष झाल्यानंतरही अमृत योजना अर्धवट आहे. यवतमाळ नगर परीषदेच्या कार्यक्षेत्रात आठ ग्रामपंचायत समाविष्ट करण्यात आल्याने लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे अमृत योजनेतून पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे. कंत्राटदार काहीच करायला तयार नसल्याने आपण जनहितार्थ हा मुद्दा उचलल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी दिली.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT