Akola Zilla Parishan. Google
विदर्भ

Akola ZP : बिलांच्या तुलनेत गावांना मिळतेय अत्यल्प पाणी; 25 दिवसांआड पुरवठा

प्रसन्न जकाते

Members Got Aggressive : पिण्याच्या पाण्याचा मुद्दा अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अकोला महापालिकेच्या हद्दीतील शहरात तर सुरुवातीपासून पाण्याचे दुर्भिक्ष होतेच. आता जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दीडशेवर गावांमध्ये 25 ते 30 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. सर्वच गावांमध्ये हे चित्र असताना जिल्हा परिषद प्रशासन पुरवठ्याच्या तुलनेत पाणी बिलावर अधिक खर्च करीत आहेत.

अकोला जिल्ह्यातील अनेक गावं खारपाणपट्ट्यात (Saline Water Track) आहेत. या गावांमधील भूजल पिण्यायोग्य नाही. त्यामुळं त्यांना विविध पाणीपुरवठा योजनांमधून जलपुरवठा केला जातो. या पुरवठ्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन संबंधित विभागाला मोठी रक्कम देत आहे. (Bills Of Akola Zilla Parishad Water Supply Schemes Increased In Comparison Of Actual Supply To Villages)

जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, पुरवठा व व्यवस्थापन केले जाते. जिल्ह्यात गोपालखेड, लंघापूर, खांबोरा, कारंजा रमजानपूर पाणीपुरवठा योजना आहेत. 84 खेडी आणि 64 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सुमारे 150 गावांना पाणीपुरवठा होतो. अशात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे या योजना चालविण्यात येतात. योजनांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांना अनियमित पाणी मिळते. मात्र, बिलापोटीची रक्कम जिल्हा परिषदेला नियमित भरावी लागते.

देखभाल, दुरुस्ती आदी कारणांसाठी जिल्हा परिषदेने 36 कोटींपेक्षाही जास्त रक्कम खर्च केली आहे. त्या तुलनेत सक्षमपणे पाणीपुरवठा होत नसल्यानं जिल्ह्यातील या योजना वादात सापडल्या आहेत. जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीतही हा मुद्दा गाजला. त्यामुळं या योजनांमधील खर्चाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी या मुद्द्यावर अध्यक्षांकडं आक्षेप नोंदविणारं पत्र दिलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाणीपुरवठा योजनांबाबत योग्य माहिती मिळत नाही. अधिकारी माहिती देण्यासाठी टाळाटाळ करतात. सदस्यांनी या विभागाकडून अनेक मुद्द्यांवर माहिती मागविली होती. त्यापैकी मोजक्याच मुद्द्यांवर माहिती पुरविण्यात आली. उर्वरित 11 मुद्दे अद्यापही अनुत्तरित आहेत. पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर खारपाणपट्ट्यातील अनेक गावांमधील सरपंचही अलीकडेच एकवटले आहेत. बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. अशात आता जिल्हा परिषदेतही खारपाणपट्ट्यातील गावांचा पाणीपुरवठा प्रश्न गाजत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT