नागपूर : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे येवढा मोठा भूकंप आला. त्यानंतर या बंडखोरीच्या मागे भारतीय जनता पक्ष आहे, भाजप सत्तेत येणार, अशा चर्चा सुरू झाल्या. या काळात आणि त्यापूर्वी बऱ्याच लोकांकडून काही भाकिते वर्तविली गेली होती.
महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) पडणार, आज पडणार, उद्या पडणार येथपासून तर या तारखेला भाजपचे सरकार येणार. अमुक अमुक तारखेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार. राज्याच्या राजकारणात भूकंप येणार… आदी आदी.. भाकिते वर्तविली गेली होती. त्याही पूर्वी भाजपच्या बाबतीत यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या आदीवासीबहुल झरीजामणी तालुक्यातील एका लहानशा गावाच्या सरपंचाने एक भाकीत वर्तविले होते, ते आता खरं ठरताना दिसत आहे.
राज्यपालांनी उद्या ३० जून रोजी विशेष अधिवेशन आमंत्रित केले आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करायचे आहेत. त्यासाठी महाविकासने जुळवाजुळव करण्यासह न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला आहे. इकडे एकनाथ शिंदे यांचे बंडखोर आमदार अतिशय शिस्तपद्भ पद्धतीने आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पावले टाकत कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन पोहोचले. तेथून गोवा आणि उद्या गोव्यातून मुंबईत सर्व बंडखोर आमदार दाखल होणार आहे. उद्या फ्लोर टेस्टमध्ये काय होईल, याचा काहीसा अंदाज आताशा आला आहे. पण क्रिकेट आणि राजकारण यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, हे मोठमोठ्या धुरंधरांनादेखील सांगता येत नाही. यामध्ये अनेकांचे अंदाज चुकतात. त्यामुळे उद्या काय होईल, हे उद्या सायंकाळी ५.३० वाजताच कळणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तेव्हाचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे तिकीट कापण्यात आले होते. काय झाले? कसे झाले? कुणी केले, याची उत्तरे शोधण्यात जाणकारांचाही कस लागला. तेव्हापासून बावनकुळे पक्षात आणि राजकारण अडगळीत टाकल्यासारखे झाले होते. नंतर पक्षाचे प्रदेश सरचिटणीसपद देऊन त्यांच्यावरील अन्याय थोडा को होईना कमी करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान यवतमाळ जिल्ह्याच्या आदीवासीबहुल झरीजामणी तालुक्यातील अहेरअल्ली या लहानशा गावाचे प्रतिनिधित्व करणारे सरपंच हितेश ऊर्फ छोटू राऊत यांनी एक भाकीत वर्तविले होते. जोपर्यंत भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात आणत नाही, तोपर्यंत भाजपच्या सत्ता हस्तगत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश येणार नाही. बावनकुळेंच्या पायगुणाने राज्यात भाजपचे सरकार येईल, असे त्यांचे भाकित होते.
नंतरच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून बावनकुळे भरघोस मतांनी निवडून आले आणि वेगाने कार्यरत झाले. तेव्हा आता महाराष्ट्रात भाजपच्या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग येईल, असे सरपंच राऊत यांनी सांगितले होते. २१ जून पासून ज्या घडामोडी घडताहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या दोन-तीन दिवसांपासून या घडामोडींनी वेग घेतला आहे, त्यावरून उद्या सभागृहात भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा होईल, असे एकंदरीत चित्र दिसते आहे. या सरपंच महोदयांचं भाकीत खरं ठरतंय का, हे उद्याचा काळच सांगणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.