Sudhir Mungantiwar, J.P. Nadda and  Bhagwat Karad
Sudhir Mungantiwar, J.P. Nadda and Bhagwat Karad Sarkarnama
विदर्भ

BJP : भाजपचे मिशन लोकसभा; चंद्रपूर हिट तर संभाजीनगर फ्लॉप, काय आहेत कारणे?

अतुल मेहेरे

BJP's Mission Lok Sabha : भारतीय जनता पक्षाने मिशन लोकसभा काल सोमवारपासून सुरू केले. महाराष्ट्रात शुभारंभ म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या दोन सभा विदर्भातील चंद्रपूर आणि मराठवाड्यातील संभाजीनगर येथे आयोजित केल्या. त्यांपैकी चंद्रपूरमधील सभा अपेक्षेप्रमाणे झाली, पण संभाजीनगरमधील सभा फ्लॉप गेली. तेव्हापासून मराठवाड्यातील भाजप (BJP) नेत्यांची झोप उडालेली आहे. काय आहेत, यामागची कारणे याची उत्सुकता भाजपसह सर्व राजकीय पक्षांतील लोकांना आहे.

चंद्रपूरची (Chandrapur) सभा आणि इतर कार्यक्रम यशस्वीपणे आटोपून जे.पी. नड्डा (J.P. Nadda) संभाजीनगरच्या सभेसाठी गेले. मात्र ती सभा फ्लॉप झाली. जास्त लोक आलेच नाहीत आणि जे आले होते, ते सुद्धा नड्डा यांचे भाषण सुरू असताना उठून गेले. त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजप नेते शॉक झाले आहेत. याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काही बाबी ठळकपणे लक्षात आल्या. पहिले कारण म्हणजे चंद्रपुरहून संभाजीनगरला (Sambhaji Nagar) पोहोचता पोहोचता नड्डा यांना उशीर झाला. लोकांना आधी तेथे ४ वाजताची वेळ दिली होती. नंतर बदलवून ती ६ वाजताची करण्यात आली. त्यामुळे लोक ताटकळत बसले होते. ४ वाजता आलेले बरेच लोक कंटाळून निघून गेले.

दुसरी गोष्ट म्हणजे, ६ वाजता आलेले लोक थांबले, पण त्यानंतरही सभा सुरू व्हायला फार वेळ लागला. नड्डा यांचे भाषण सुरू होईपर्यंत जवळपास रात्रीचे ८ वाजले होते. त्यापूर्वी काही रटाळ भाषणे झाली. रावसाहेब दानवे मुडमध्ये दिसले नाहीत, भागवत कराडांनी खूप जास्त वेळ घेतला आणि पंकजा मुंडे पत्रिकेत नाव नसूनही आल्या पण फक्त ३० सेकंद बोलल्या. जेव्हा नड्डा यांचे भाषण सुरू झाले. पण त्यांच्या भाषणात लोकांना रस दिसला नाही आणि त्यांचे भाषण सुरू झाल्यावर लोक उठून जायला लागले.

तिसरे कारण म्हणजे नियोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. पण ताप असल्यामुळे चंद्रपूरच्या सभेला ते आले नाहीत. पण सायंकाळपर्यंत बरे होऊन संभाजीनगरला ते जातील, अशी अशा अनेकांना होती. देवेंद्र फडणवीस औरंगाबादला येणार की नाही, अशी विचारणा करणारे काही कॉल्ससुद्धा विदर्भातील कार्यकर्त्यांना आले. पण फडणवीस औरंगाबादला येणार नाहीत, याची खातरजमा झाल्यावर त्यांना ऐकायला येणारा त्यांचा जो चाहता वर्ग होता, तो नाराज झाला आणि सभेकडे फिरकला नाही, असेही काहींनी सांगितले.

चौथे कारण म्हणजे भागवत कराड यांनी या सभेची सर्व जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. कारण त्यांना शक्तिप्रदर्शन करायचे होते. त्यासाठी त्यांनी सभेचे सर्वाधिकार त्यांच्या चिरंजीवांना दिले होते. त्यांनी इतर पदाधिकारी जसे, शहराध्यक्ष, सरचिटणीस आणि कार्यकर्त्यांना सोबत घेतले नाही. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी हात वर केले. परिणामी ५० हजार लोकांची क्षमता असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात पाच हजारांचीही गर्दी जमली नाही. जी गर्दी जमली ती नड्डा यांची दर्दी नव्हती. कारण एक वक्ता म्हणून किंवा चेहरा म्हणून नड्डा तेवढे लोकप्रिय नाहीत, असेही लोक सभास्थळी बोलत होते. या कारणांमुळे संभाजीनगरची सभा फ्लॉप गेली.

इकडे चंद्रपूरला विदर्भाची टीम होती. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आदी होते. समन्वय चांगला होता, तयारीही चांगली झाली होती. त्यामुळे चंद्रपूरची सभा अपेक्षेप्रमाणे हिट झाली. संभाजीनगरला देवेंद्र फडणवीस नसल्यामुळे लोक आले नाहीत, असे एक कारण सांगितले जाते, मग तो निकष चंद्रपूरसाठी लागू पडत नाही का, असाही एक प्रश्‍न उपस्थित होतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT