Eknath Khadase and Girish Mahajan
Eknath Khadase and Girish Mahajan Sarkarnama
विदर्भ

Eknath Khadse On Girish Mahajan: तेव्हा साडेसहा हजारांसाठी गिरीष महाजन विनवण्या करीत होते, आता कुठं आहेत?

सरकारनामा ब्यूरो

Budget Session of Legislature News : कापसाचा भाव १२ ते १४ हजार रुपयांपर्यंत गेला होता, पण सद्यःस्थितीत तो ७ ते ७ हजार ५०० रुपयांवर आला आहे. शेतकऱ्यांनी घराघरांत कापूस साठवून ठेवलेला आहे. त्यामुळे रोगराईचा प्रसार होतो आहे. तरीही सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, असा घणाघात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत केला.

कापसाच्या प्रश्‍नावर बोलताना खडसे म्हणाले, शेतकऱ्यांचा हा महत्वाचा विषय आहे. कांदा, कापूस, हरभरा या सर्वच पिकांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. काल अमरावतीमध्ये शेतकऱ्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. ते गुन्हेगार आहेत का, दहशतवादी आहेत का, असे सवाल करीत यावर चर्चा होण्याची गरज आहे. सरकारने निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे. पण सरकार शेतकऱ्यांप्रति गंभीर दिसत नाही.

१० वर्षांपूर्वी गिरीष महाजन १० वर्षांपूर्वी साडेसात हजार रुपये भाव मिळावा म्हणून १० दिवस उपोषणाला बसले होते. गिरीष भाऊंनी तेव्हा आमरण उपोषण केलं होतं. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर निरोप पाठवला की नाथाभाऊ लवकर माझं उपोषण सोडवा. गोपीनाथ मुंडेंना बोलवा. माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता, गोपीनाथ मुंडे बाहेर होते. अशा परिस्थिती महाजन म्हणाले होते, की काहीही करा नाही साडेसात, तर साडेसहा भाव करा, पण उपोषण सोडवा. कारण माझा जीव मेटाकुटीला आला आहे, असे महाजन म्हणाल्याचे खडसेंनी सांगितले.

मी सांगितले की, हे आमरण उपोषण आहे आणि तू शेतकऱ्यांचा नेता आहे. त्यामुळे मरेपर्यंत उपोषण कर. तेव्हा ही स्थिती होती आणि आज हाच नेता मंत्री झाला आणि मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून याठिकाणी बसला आहे. आता शेतकऱ्यांची ही अवस्था असताना गिरीष महाजन कुठं आहे. १० वर्षांपूर्वी सात ते साडेसात हजार रुपये भाव मागणारे गिरीष महाजन आज कुठे आहेत? आज शेतकरी मरतोय आणि या ठिकाणी काय टिंगल चालली आहे का, असा सवाल करीत खडसे (Eknath Khadase) चांगलेच संतापले.

मालेगाव, नाशिकमध्ये (Nasik) शेतकऱ्यांनी कांद्यासाठी आंदोलन केले. शेतकरी हवालदिल झाला आहे. नेहमीच सरकारच्या विरोधी आम्ही भूमिका घेत होतो. भाव मागत होतो. १३ ते १४ हजारांचा भाव मिळत होता कापसाला. आज ७ हजार मिळत आहे. कापूस एकाधिकार योजना बंद झाली. सीसीआयने खरेदी बंद केली.

व्यापाऱ्यांनीही हात आखडता घेतला आहे. १० वर्षापूर्वी साडेसात हजार भाव मिळावा म्हणून गिरीष महाजनांनी (Girish Mahajan) उपोषण केले होते. आज त्यांच्या हिशोबाने कापसाला किती भाव असला पाहिजे, हे त्यांनी सांगावे आणि कापसाला, कांद्याला आणि सर्वच पिकांना योग्य भाव दिला पाहिजे, असे एकनाथ खडसे सभागृहात म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT