Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : चीनमधून तिरंगा झेंडा आणून भाजपने देशाचा, स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यात आझादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शेगाव येथे बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश एकडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्याचारी ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी मोठा व प्रदीर्घ लढा द्यावा लागला. काँग्रेसच्या (Congress) झेंड्याखाली देश एकवटला आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या काँग्रेस विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते लोक आज ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या नावाखाली इव्हेंटबाजी करत आहेत. या इव्हेंटबाजीसाठी चीनमधून (Chin) तिरंगा झेंड्यांची आयात करण्यात आली, हा स्वातंत्र्यसैनिकांचा व तिरंगा झेंड्याचा अपमान आहे, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात सुईचेही उत्पादन होत नव्हते. पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या (Jawaharlal Neharu) दूरदृष्टी नेतृत्वाखाली भारताने प्रगतीचे एक-एक शिखर गाठले व भारताला जगात प्रगत राष्ट्र म्हणून उभे केले. इंदिरा गांधी, (Indira Gandhi) राजीव गांधी यांनीही विकासाची कास धरत विकासाची घोडदौड कायम ठेवली. पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंह यांनीही विकासाच्या विविध योजना देशात राबविल्या. म्हणून भारत आज एक शक्तिशाली देश म्हणून उभा आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधींनी देशासाठी बलिदान दिले आहे. परंतु केंद्रात सत्तेवर असलेले आजचे भाजप सरकार काँग्रेस सरकारने उभे केलेले देशाचे वैभव असलेल्या सार्वजनिक कंपन्या विकत आहे. ‘अग्निपथ’ सारखी योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. किराणा मालावरही जीएसटी लावून जनतेची लूट केली जात आहे.

चीन आपल्या सीमाभागात घुसखोरी करत आहे. पण ५६ इंच छातीचे पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत. उलट चीनमधून तिरंगा झेंड्यांची आयात करून त्यांना आर्थिक लाभ कसा करवून देता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे. भाजप हा खोटे बोलून सत्तेत आला आहे, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून जनजागृती करत भाजपचा खोटेपणा उघडा पाडण्याचे काम केले जाणार आहे, असे पटोले म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात धुळे व जळगाव जिल्ह्यातील आझादी गौरव पदयात्रेत सहभागी झाले. धुळे जिल्ह्यातील क्रांतिभूमी कापडणे येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि काँग्रेस पदाधिकारी यावेळी सोबत होते.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की ‘राष्ट्रालाच देव माना‘ हा विचार सांगणाऱ्या तात्यासाहेब माधवराव दिवाण पाटलांचे कापडणे हे गाव. महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन या गावाने स्वतःला स्वातंत्र्यसंग्रामात झोकून दिले. दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, लळींग सत्याग्रह, सविनय कायदेभंग, चिमठाणा खजिना लूट अशा अनेक स्वातंत्र्य मोहिमांमध्ये कापडणे गावाच्या नागरिकांचा सक्रिय सहभाग राहिला. १९३६ मध्ये फैजपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनादरम्यान महात्मा गांधीजींच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य कापडणे गावाच्या अनेक क्रांतिवीरांना मिळाले. त्यामुळेच १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळी मध्ये या गावाने मोठा पुढाकार घेतला. आज या क्रांती भूमीच्या दर्शनाने समाधान मिळाले. त्यावेळी इंग्रजांच्या ताब्यातून देश स्वतंत्र करण्यासाठी लढा दिला आज लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा द्यावा लागत आहे. नाना पटोले उद्या ११ ऑगस्ट रोजी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT