Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
विदर्भ

चंद्रकांत पाटलांनी विचारले, नितीन राऊत झोपा काढत आहेत का?

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : आजवर महाराष्ट्र सर्वाधिक सुरक्षित होता, तो फक्त फडणवीस यांच्याच काळात होता, असे माझे म्हणणे नाही. तर येथे महिलांना सुरक्षितता होती. पण आज गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शहरात, गल्लीत पाकीटमारी...’, अशा बातम्या चालायच्या. मग आता पालकमंत्री नितीन राऊत झोपा काढत आहेत का? येथे सुरू असलेला क्राईम त्यांना दिसत नाहीये का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केला.

नागपुरात आले असता चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात रात्री बे रात्री महिला, मुली गरबा खेळून घरी जाऊ शकत होत्या. पण आता तसे होत नाहीये. घरच्या कुणाला सोबत घेतल्याशिवाय महिला रात्री घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. कारण गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्रात आज महिला असुरक्षित आहेत. तर महिला नेत्या खासदार सुप्रिया सुळे यावर बोलत का नाहीयेत. त्यांना माझ्या काळामध्ये रस्त्यांवरील खड्डे दिसायचे. त्या सेल्फीसुद्धा काढायच्या. आज होणारे बलात्कार, कोयत्याने होणार वार सुप्रियाताईंना दिसत नाहीयेत का? निलम गोऱ्हे आज कुठे आहेत. महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत तर त्या खूप बोलायच्या. आज कुठे दिसत नाहीत. विद्या चव्हाण कुठे आहेत? असे प्रश्‍न उपस्थित करीत. या महिला सत्तेसाठी मोठी ॲडजेस्टमेंट करीत आहेत. पण सत्तेसाठी महिलांच्या सुरक्षेच्याबाबतही ॲडजेस्टमेंट करायची, हे योग्य नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीचा भंडाफोड सुरू झालाय...

महाविकास आघाडी सरकारचा भंडाफोड फार पूर्वीपासूनच सुरू झाला आहे. अनिल देशमुख यांच्यापासून तो सुरू झाला तर संजय राठोड, अनिल परब नंतर अजित पवारांपर्यंत तो आला आहे. आता मंत्रिमंडळात आणखी कोण बाकी आहेत, त्याची चाचपणी सुरू आहे आणि आम्ही प्रबळ, प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करत आहो, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार सर्वांचे गुरू आहेत. ते आणि त्यांचे शिष्य काहीही झाले की त्याचे खापर केंद्र सरकारवर फोडतात. कोळसा कमी आहे, त्यामुळे वीज कमी निर्माण होणार आहे आणि राज्यावर लोडशेडींगचे संकट आहे. यासाठी केंद्राने कोळसा दिला नाही, असे त्यांचे नेते सांगत आहेत. पण ते हे सांगत नाही, कोळसा स्टॉक केला नाही. पावसामुळे कोळसा कमी मिळणार आहे. आधीच स्टॉक करून ठेवला पाहिजे, केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले होते, असेही ते म्हणाले.

ताटात आणखी पाडून घेण्यासाठी असते नाराजी..

शरद पवारांना केंद्राने सरकार स्थापन करण्यासाठी ऑफर दिली होती, असे ते सांगतात. तर ती ऑफर न स्वीकारण्याइतके ते कच्च्या गुरूचे चेले नाहीत. केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पक्षासोबतच सरकार स्थापन करण्याला त्यांना प्राधान्य दिले असते. पण तसे झाले नाही, त्यामुळे ते काय बोलतात, काय करतात, हे आता सामान्य लोकांना देखील समजले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची नाराजी ही ताटात आणखी काही पाडून घेण्यासाठी असते. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT