Sand Mafiya in Bhandar District
Sand Mafiya in Bhandar District Sarkarnama
विदर्भ

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक मध्यरात्री धडकले वाळू घाटावर, अन...

Abhijeet Ghormare

भंडारा : भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर वाळू तस्करांनी गेल्या बुधवारी प्राणघातक हल्ला केला होता. हे प्रकरण भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी चांगलेच चांगलेच गांभीर्याने घेतले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह काल मध्यरात्री १.३० ते २ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील वडेगाव वाळू घाटावर धडक दिली.

भंडारा (Bhandara) जिल्हाधिकारी (Collector) आणि पोलीस अधीक्षक (SP) घाटावर पोहोचले तेव्हा अवैधपणे वाळू ट्रॅक्टर भरले जात होते आणि खुलेआम वाहतूक सुरू होती. यावेळी त्यांच्या पथकाने तब्बल ११ ट्रॅक्टर जप्त केले आणि तस्करांच्या (Sand Mafiya) टोळीतील दोघांना अटक केली. जयदेव धनराज बोरकर (३५, रा. बेरोडी) आणि महेंद्र रतिराम हजारे (२१, रा. सुरेवाडा) ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर वाळू तस्करांनी हल्ला केल्यानंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. राठोड यांच्या पथकावर बेटाळा येथे गत बुधवारी पहाटे २२ वाळू तस्करांनी हल्ला केला होता. याचा परिणाम म्हणून की काय वाळू तस्करांची कंबर मोडण्यासाठी हल्लेखोर वाळू तस्करांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव हे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांसह भंडारा तालुक्यातील कुप्रसिद्ध वडेगाव रेती घाटावर धडकले.

अधिकारी कारवाईसाठी आल्याचे पाहताच रेती तस्करांनी वाहन सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात असताना २ आरोपींना अटक करण्यात आली आणि वाळूने भरलेले ११ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाचा अशा कारवाईची धडकी तस्करांनी घेतली आहे. उपविभागीय अधिकारी राठोड यांच्या हल्ला होण्यापूर्वी तहसीलदारांनी तस्करांकडून धमक्या देण्यात आल्या होत्या. त्याचाही तपास आता सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. त्या प्रकरणातील आरोपीही लवकरच जेरबंद होण्याची शक्यता आहे.

भविष्यात आणखी अशा मोठ्या कारवाया करण्यात येणार आहेत. अवैधपणे वाळू उत्खनन करणारे आणि त्याची वाहतूक करणाऱ्यांना चाप लावण्यात येणार आहे. मागील काळात तस्करांची हिंमत अधिकच वाढली होती. त्यांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे तस्करांना आत्ताच ठेचणे गरजेचे आहे. या तस्करांनी भविष्यातही डोके वर काढू नये, म्हणून कारवाईचा फास भविष्यात आणखी आवळला जाणार असल्याचे भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT