Amravati Forest Department Sarkarnama
विदर्भ

Forest Department : पुन्हा अमरावती! वनसंरक्षकाविरुद्ध आरएफओची महिला आयोगाकडे तक्रार

प्रसन्न जकाते

Forest Department : नागपुरातील आरटीओ कार्यालयातील महिला मोटार वाहन निरीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यातील पोलिस तक्रारीचे प्रकरण राज्यभरात गाजले होते. आता अशाच स्वरुपाच्या गंभीर तक्रारीचे पत्र अमरावती जिल्ह्यातील एका महिला आरएफओने वरिष्ठांविरुद्ध महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे पाठविले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी आरएफओ दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे मेळघाटचा वनविभाग चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा याच अमरावती जिल्ह्याने दहा पानी तक्रारीमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अमरावती येथे कार्यरत असलेल्या एका महिला आरएफओने आपल्या दहा पानांच्या तक्रारीत उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मिश्रा हे काही महिन्यांपूर्वीच अमरावती जिल्ह्यात रूजू झाले आहेत. मिश्रा यांच्या कारभाराला आरोप करणाऱ्या महिला आरएफओने ‘यूपी राज’ असे संबोधित केले आहे. तक्रार करणारी आरएफओ अमरावतीत 21 महिन्यांपासून कार्यरत आहे. मिश्रा यांच्याकडून आर्थिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याचा पीडितेचा आरोप आहे. आरएफओने तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्य वनसंरक्षकांच्या भेटीत अधिकाऱ्यांनी आएफएस मिश्रा यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मिश्रा यांच्याकडून सहकारी अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. महिला आरएफओने देखील आपल्या तक्रारीत याचा उल्लेख केला आहे. उपवनसंरक्षक मिश्रा यांच्या बंगल्याची देखभाल, दुरूस्ती सध्या सुरू आहे. ही दुरूस्ती नियमबाह्य पद्धतीने व अंदाजपत्रक मंजूर नसताना सुरू असल्याचा आरोप होत आहे. बंगल्यातील फर्निचर, स्वच्छता साहित्य, मशरूम गार्डन आदीसाठी दबाव आणला जात असल्याचे महिला आरएफओने तक्रारीत नमूद केले आहे.

वडाळी येथे वनविश्रामगृह आहे. अमरावती जिल्ह्यातील या विश्रामगृहात मिश्रा यांच्याकडून मांसाहारी जेवण तयार करण्याचे आदेश देण्यात येतात. शासकीय विश्रामगृहात मांसाहाराला मनाई असतानाही हा प्रकार सुरू असल्याचे पत्रात नमूद आहे. अमरावतीच्या उपवनसंरक्षकांकडे एकूण पाच वनपरिक्षेत्र आहेत. त्यापैकी दोन वनपरिक्षेत्रात महिला अधिकारी कार्यरत आहेत. दिपाली चव्हाण यांच्याप्रमाणे एका अधिकाऱ्याला वागणूक देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत आहे. या घटनेनंतर सर्वच आरएफओंच्या शासकीय रिव्हॉल्वर काढून घेण्यात आल्या होत्या.

एक धडा पुरेसा नाही का?

मेळघाटच्या हरिसाल येथे कार्यरत असलेल्या आरएफओ दिपाली चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार कारणीभूत असल्याचे नमूद केले होते. शिवकुमार यांचे वरिष्ठ तथा मुख्य वरसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही दिपाली यांनी आरोप केले होते.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT