Ashok Chavan and Devendra Fadanvis
Ashok Chavan and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Congress : अशोक चव्हाणांनी फडणवीसांच्या जवळच्या नेत्याला दिली ‘ही’ ऑफर !

सरकारनामा ब्यूरो

Ashok Chavan News : डॉ. परिणय फुके यांच्याशी माझे आजचे नाही, तर फार जुने संबंध आहे. अगदी त्यांच्या वडीलांशीही माझे फार चांगले संबंध आहेत. येथे गिरीष पांडव बसलेले आहेत, त्यांच्या वडिलांशीही मी वरच्या सभागृहात असतानापासून माझे संबंध राहिलेले आहेत. त्यांच्या सोबत आम्ही काम केलेले आहे, असे सांगत अशोक चव्हाण यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा कोरडीनजीकच्या महादुला येथे पार पडला त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, डॉ. परिणय फुके मघाशी म्हणाले की ‘येथे मी ऑड मॅन आऊट’ आहे. पण तसं नाहीये. तुमचं भाषण झाल्यानंतर तुम्हाला येवढ्या वेळात कधी तरी वाटलं का ‘ऑड मॅन’ सारखं? असा प्रश्‍न करीत एकदम जुन्या कॉंग्रेससारखं वातावरण येथे आहे.

आमच्याकडे काही प्रॉब्लेम्स आहेत का, असे विचारत तुमच्याकडे काय चाललंय, हे मला माहिती नाही. आमच्याकडे सगळं कसं व्यवस्थित आहे. तुमचाही सन्मान येथे झाला आहे. आता तर तुम्ही भाजपमध्ये आहात, असे वाटतही नाही. तुम्हाला वाटत असेल तर येऊन जा इकडे, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी परिणय फुकेंना थेट कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफरच देऊन टाकली आणि एकच हंशा पिकला. नंतर ‘हा झाला गमतीचा भाग’, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.

फडणवीसांनी मला खोटं ठरवलं होतं..

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील समितीचा मी अध्यक्ष होतो. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून या प्रश्‍नासाठी मी न्यायालयीन आणि आयोगासोबत लढाई लढतो आहे. मी देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितलं होतं की, केंद्रात सरकार तुमचं आहे. राज्य सरकारला अधिकार बहाल करण्याचा निर्णय घेतला, ही चांगली गोष्ट आहे. मी स्वतः सभागृहामध्ये बोललो होतो की, राज्याला हा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. तेव्हा फडणवीस (Devendra Fadanvis) मला म्हणाले होते की, तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत आहात.

जेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहात बिल पास करून राज्याला निर्णय घेण्याचा अधिकार दिला, याचा अर्थच असा आहे की, मी म्हणालो होतो, तेव्हा राज्याला आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. फक्त अधिकार देऊन फायदा नाही, तर ५० टक्क्यांची मर्यादा ती काढल्याशिवाय उपयोग नाही.

मराठा समाजासाठी ती मर्यादा काढून १० टक्के वाढवून दिले असते, तर त्याचा फायदा झाला असता आणि आरक्षण देणं सोपं झालं असतं. मग भलेही सरकार तुमचं असो की आमचं. तेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी साथ दिली नाही. त्यामुळे आरक्षणाचा विषय आजही खितपत पडलेला आहे, असे चव्हाण (Ashok Chavan) यांनी सांगितले.

राज्यातील लोकांनाही आता असे वाटायला लागले आहे की, निवडणूक (Election) आली की नेते आरक्षणाचा विषय उकरून काढतात आणि निवडणुका झाल्या की सोडून देतात. सत्ताधाऱ्यांवरून लोकांचा विश्‍वास आता उडत चालला आहे. ते सत्ताधारी मग कुणी असो, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT