Sanjay Raut-Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Patole VS Raut : स्वबळाचा नारा देणाऱ्या राऊतांना नाना पटोलेंनी फटकारले; ‘काँग्रेसला त्यांच्याशी काही...’

Mahavikas Aghadi : सध्या लोकशाहीच धोक्यात आल्याचे दिसते. विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्या बूथवर किती मतदान झाले, याची माहिती निवडणूक आयोग द्यायला तयार नाही. आयोगच भाजपसोबत असल्याचे दिसून येते.

Rajesh Charpe

Nagpur, 14 January : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटल्याची चर्चा सध्या राज्यात जोरात सुरू आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही. अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. निवडणुका लागते की नाही हीच शंका आहे. जेव्हा केव्हा निवडणुका लागतील, तेव्हा बघू, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ आता सैल होत चालली असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेसची वाकडी झालेली पाठ सरळ व्हायला तयार नसल्याचा थेट आरोप केला होता. त्यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही जागा वाटपाचा घोळ काँग्रेसनेच लांबवला, त्यामुळे काही उमेदवार पराभूत झाल्याचा टोला लगावला होता.

कोल्हे आणि राऊत यांच्या टीकेला माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच प्रत्युत्तर दिले होते. या सर्व वादावर गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले (Nana Patole) मौन बाळगून होते. आज मात्र त्यांनी संजय राऊत हा आमचा विषय नसल्याचे सांगून त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीवर ते काही काहीही बोलले तर महाविकास आघाडीत फूड पडल्याच्या बातम्या येतात. भाजपचेच नेते अशा बातम्या पेरत आहेत. खरेतर महायुतीमध्ये फूट असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला.

पटोले म्हणाले, सध्या लोकशाहीच धोक्यात आल्याचे दिसते. विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्या बूथवर किती मतदान झाले, याची माहिती निवडणूक आयोग द्यायला तयार नाही. आयोगच भाजपसोबत असल्याचे दिसून येते. दाल मे कुछ काला है हेसुद्धा म्हणायला निवडणूक आयोगाने जागा ठेवली नाही. संपूर्ण डाळच काळी आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर जनतेच्याही मनात शंका आहे.

बीड आणि परभणी प्रकरण सरकार प्रायोजित आहे. मूळ मुद्यांकडे लक्ष जाऊ नये, यासाठी हे प्रकरण तापवत ठेवले जात आहे. वाल्मिक कराडच नव्हे; तर संतोष देशमुख यांच्या खुनात कोण कोण सामील आहे, याची सर्व माहिती गृह खात्याकडे आहे. मात्र, मंत्रिमंडळात असलेल्या एका आरोपीला सुरक्षित करण्याचे काम महायुती सरकारच्या वतीने केले जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT