Dr. Ashish Deshmukh
Dr. Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीवर डाॅ. आशिष देशमुख यांचा आक्षेप

Atul Mehere

नागपूर : कॉंग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष लोकशाही मार्गाने आणि कॉंग्रेसच्‍या संविधानाने लिहून दिलेल्यानानुसार निवडला जातो. मग देशभरात प्रदेशाध्यक्षाची निवड त्याच पद्‍धतीने का केली जात नाही, असा प्रश्‍न कॉंग्रेस नेते, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी उपस्थित केला आहे. एकप्रकारे त्यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे.

यासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना आशिष देशमुख म्हणाले, (Dr. Ashish Deshmukh) आम्हाला प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत जी माहिती मिळाली त्यानंतर आम्‍ही अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार केंद्रीय निवड समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी जाहीर केले की, सर्वानुमते ठराव करण्याचे काम प्रत्येक प्रदेशातून व्हावे. त्यानुसार येत्या १९ तारखेला बैठक मुंबईतील (Mumbai) यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम येथे होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडून येणार आहे, तर मग प्रदेश अध्यक्षाच्या निवडीचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षाला देण्याची जी पद्धत आहे, ती लोकशाहीला अनुसरून नाही आणि कॉंग्रेसच्या (Congress) संविधानाला अनुसरून नाही आहे.

संविधानाच्या विरोधात जाऊन कुठेतरी ही निवड प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे त्यावर आपसूकच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसचे जे लोक आहेत, त्यांनी या विरोधात आवाज उठविला पाहिजे. आपला प्रदेशाध्यक्ष निवडणुकीतून निवडून आलेला असला पाहिजे, त्याला लोकमान्यता असली पाहिजे. आपल्या येथील ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे जे सदस्य आहेत, तेसुद्धा निवडून आलेले असले पाहिजे. जेणेकरून सीडब्ल्यूसी स्थापन होईल, ती वजनदार, दमदार आणि लोकमान्यतेची राहील, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि एकुणच देशभरातील सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची तेव्हा निवड झाली नव्हती, तर नेमणूक झाली होती. आता अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ऑक्टोबरमध्ये या पदावर कुणी निवडून येणार आहे, तर मग प्रदेशचे अध्यक्ष याच पद्धतीने का निवडले जात नाही, हा माझा प्रश्‍न आहे. त्या अनुषंगाने येत्या १९ तारखेपर्यंत फेरबदल अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे मधुसूदन मिस्त्री यांनी प्रक्रियेमध्ये करावा, असेही त्यांनी सुचविले आहे.

प्रक्रियेत सुधारणा करूनच मग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा आणि राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसोबतच प्रदेश अध्यक्षासाठी निवडणूक जाहीर करावी. ही मागणी मी आधीपासूनच करत आलो आहे, असे डॉ. आशिष देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या मागणीमुळे कॉंग्रेसच्या गोटात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. आपल्या भूमिकेसाठी आग्रही असणारे नेते म्हणून आशिष देशमुख ओळखले जातात. विदर्भाच्या मुद्यावरही ते आता सक्रिय झाले आहेत. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांना नागपुरात पाचारण केले आहे. आता त्यांच्या या मागणीची दखल वरिष्ठ नेते घेतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT