Vikas Thakre 1 Sarkarnama
विदर्भ

Vikas Thakre : ''मविआ'त आणि काँग्रेसमध्ये छुपे गद्दार'; विकास ठाकरे यांनी उडवली अनेक इच्छुकांची झोप

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांना लोकसभेतील पराभव चांगला जिव्हारी लागला आहे. त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना तोडीची लढत दिली होती. गडकरींच्या मताधिक्यात तब्बल दीड लाखांनी घट केली. सर्व वातावरण आघाडीच्या बाजूने असताना पराभव झाल्याने ठाकरे यांचा सर्व रोष पक्षांर्गत छुप्या गद्दारांवर आहे.

ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जाहीर कार्यक्रमात याचा उल्लेख केला. गद्दरांची नावे आपल्याकडे असल्याचे सांगितल्याने त्यांचा रोष नेमका कुणाकडे आहे, याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली आहे. सोबतच विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या अनेकांची झोप उडाली आहे.

नागपूरमध्ये (Nagpur) झाकीर हुसेन मंचच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार विकास ठाकरे यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षातील गद्दारांची यादी आपल्याकडे असल्याचे सांगितल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी अनेक काँग्रेसच्या नेत्यांना फोन केले होते. त्यांच्या दबावात अनेकांनी काँग्रेसचे काम केले नाही. नाही तर आज नागपूरचे चित्र वेगळे दिसले असते, असाही दावा विकास ठाकरेंनी केला आहे.

ठाकरेंना हटवण्याची खटपट

विशेष म्हणजेय पूर्वीसुद्धा आमदार ठाकरे काँग्रेसच्या (Congress) नागपूर इथं झालेल्या मेळाव्यात गद्दारांचा उल्लेख केला होता. यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. विकास ठाकरे तब्बल दहा वर्षांपासून काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. त्यांना हटवण्यासाठी पक्षातील अनेकांनी खटपट केली होती. 'एक व्यक्ती एक पद', या काँग्रेसच्या धोरणाचे काय झाले, अशी विचारणा काँग्रेसच्या बैठकीत नरेंद्र जिचकार यांनी केली होती.

चव्हाणांवर शाईफेक

यावरून मोठा राडा झाला होता. नरेंद्र जिचकार यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. ठाकरे यांच्या नेतृत्वात यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही मोठा राडा झाला होता. त्यांनी आपल्याच समर्थकांना दीडशेपैकी जवळपास शंभर तिकिटांचे वाटप केल्याचा त्यांचा पक्षांतर्गत विरोधकांचा आरोप होता. त्यावेळी नगरसेवक तानाजी वनवे यांच्या प्रचाराला आलेल्या तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.

पक्षात अंतर्गत धुसफूस

तेव्हापासून काँग्रेस पक्षात उभी फूट पडली होती. दोन गटाच्यावतीने वेगवगेळे कार्यक्रम राबवले जात होती. 2014 च्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये शांतता निर्माण झाली होती. गटबाजी उघडपणे बंद झाली होती. लोकसभेच्या निवडणुकीत उघडपणे काँग्रेसच्या विरोधात कोणी बोलले नाही. त्यामुळे काँग्रेस एकजूट झाल्याचा संदेश गेला होता. मात्र अंतर्गत धुसफूस कायमच असल्याचे ठाकरे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा समोर आले आहे. ठाकरे कदाचित विधानसभा तिकीटवाटपाच्या वेळी गद्दारांची यादी उघड करू शकतात या भीतीने निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांची झोप उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT