Nana Patole and PM Modi  Sarkarnama
विदर्भ

PM Modi Visit Yavatmal : मोदींच्या सभेसाठी महिलांना जबरदस्तीने बसमध्ये बसवून नेले; नाना पटोलेंचा गंभीर आरोप !

जयेश विनायकराव गावंडे

Yavatmal News: "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या सभेसाठी आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने बसवून सभेला नेले आहे. विदर्भ मराठवाड्यातील बस मोदींच्या सभेसाठी वापरल्यामुळे जनतेचे हाल झाले आहेत.

मोदींच्या सभेचा खर्च भाजपाने (BJP) करण्याऐवजी तो सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. केवळ पंडालवरच 12 कोटी 73 लाख 33 हजार 500 रुपये खर्च करण्यात आला असून हेलिपॅडसाठी साडे तीन कोटी रुपये खर्च करण्यात आला. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे", असा आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Marathi News)

नाना पटोले (Nana Patole) यांनी नरेंद्र मोदी यांच्या सभेवर गंभीर आरोप केले आहेत. स्वयंघोषीत विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सभेसाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून गर्दी जमवण्यात आली आहे. बसमध्ये महिलांना कोंबून बसवले आहे, एखाद्या वाहनात जास्त लोक बसले तर आरटीओ कारवाई करतात. मग यांच्यावर कारवाई कोण करणार? भाजपासाठी कायदा वेगळा आहे का ? असे प्रश्नही नाना पटोले यांनी विचारले आहेत. जनता सध्या नरेंद्र मोदी व भाजपला कंटाळली आहे. मोदींच्या सभेतील खुर्चीवर राहुल गांधी यांचे पोस्टर लावून जनतेने योग्य तो संदेश दिला आहे, असंही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यवतमाळमध्ये 2014 च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दिडपट भाव देणार, स्वामीनाथन अहवाल लागू करणार, सत्तेत येताच पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करणार, अशी आश्वासने दिली होती. परंतु सत्तेत येतात मोदी सर्व विसरले आणि तो चुनावी जुमला होता, असे म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचेही पटोले म्हणाले.

तर यवतमाळ ही संतांची भूमी आहे, संतांच्या भूमित नरेंद्र मोदी (PM Modi) खोटे बोलले. आता यवतमाळची जनता व शेतकरी मोदींच्या भुलथापांना फसणार नाहीत. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, शेतकरीच भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल, असंही ते म्हणाले.

भाजपकडूनच मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

महायुतीत जागा वाटपावरुन मोठा असंतोष व गोंधळ आहे. त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री अंतरावली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांना भेटले होते. त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचे उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांचा एक ओएसडी सतत जरांगेच्या संपर्कात होता. जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहेत. टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

नांदेडमधील तीन आमदार काँग्रेसबरोबरच...

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटना मजबूत आहे, काहीजण भितीपोटी पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ते व जनता काँग्रेसबरोबरच आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन्ही आमदार माधवराव पाटील, मोहनराव हंबर्डे, जितेश अंतापूरकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकारी सर्वजण काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत. नांदेड जिल्हा काँग्रेस (Congress) विचाराचा असून लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार दिला जाणार असून विजयी होणार आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT