MLA Nana Patole. Google
विदर्भ

Nagpur : तीन राज्यांतील जनतेचा कौल मान्य, त्रुटी सुधारत कामाला लागलोय

Atul Mehere

Lok Sabha Election 2024 : विधानसभेच्या 2018 मधील निवडणुकीपेक्षा छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसनं अधिक मतं मिळविली आहेत. या निवडणुकीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्त फायदा झाला. आता नेमकं त्याच्या उलट होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाच फायदा होणार असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांनंतर त्यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या त्रुटी राहिल्या असतील, त्या दूर करून आम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असं ते म्हणाले. (Congress State President Nana Patole Says Party Will Win Lok Sabha Election 2024 Got More Percentage Of Votes in Telangana, Rajasthan, Chhattisgarh & Madhya Pradesh Assembly Election 2023)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमची तयारी सुरू झाली. आम्ही चार राज्यांतील निवडणुकीनंतर कोणत्या त्रुटी कुठे राहिल्या याचं अवलोकन करीत आहोत, असं ते म्हणाले. ‘इंडिया’ आघाडीबाबत कुणीही काहीही चर्चा केली तरी फरक पडत नाही. काँग्रेस तडजोड न करणारा पक्ष आहे. काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आहे. आम्हाला पक्षानं सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं शिकवलं. आमच्या ते विचारात आहे.

शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना तडा देत विभाजनाचं राजकारण भाजप करीत आहे. आतापासूनच भाजपचं सरकार येईल आणि वानखेडेवर शपथ घेऊ, असं जर कुणी म्हणत असेल तर हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा अद्याप भाजपनं योग्य विचार केलेला दिसत नाही, असं पटोले म्हणाले. भाजपला महाराष्ट्राला लुटायचं आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल निकाल शाहू, फुले, आंबेडकर विचारांशी एकरूप असलेल्या पक्षांच्या बाजूनं लागेल, असं पटोले यांनी सांगितलं. काँग्रेस फुटणार असे दावे केले जात आहेत. या चर्चेला आता पूर्णविराम देण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या भाजपमध्ये किती विकोपाचे वाद आहेत, हे सर्वांनी टीव्हीवर बघितलं आहे. आता हे पक्ष अगदी सर्वकाही ‘ऑलवेल’ असल्याचं भासवत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं ज्या घोषणा केल्या, ते सगळे ‘जुमले’ ठरू नयेत, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. जनमताच्या कौलाचा नेहमीच काँग्रेसने आदर केला. आम्ही या वेळीही मतदारांच्या निर्णयाचा आदर करतो. ज्या काही चुका झाल्या असतील त्याचं आत्मपरीक्षण करून त्या सुधारण्यात येतील, असं नाना पटोले म्हणाले.

ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होती, त्या सर्व राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये भाजपचा पराभव झाला. तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशची आकडेवारी भाजपनं एकदा बघावी. त्यावरून महाराष्ट्रात काय होऊ शकते, याचा अंदाज भाजपला नक्कीच येईल, असा दावा पटोले यांनी केला. लकवरच महाराष्ट्रात मोठं परिवर्तन झाल्याचं देशाला बघायला मिळणार आहे. भाजपची उलटगिनती महाराष्ट्रातूनच सुरू होईल, असंही ठामपणे पटोले यांनी नमूद केलं. काँग्रेला बूथवर बसायलाही माणसं मिळणार नाहीत, असं भाजप सांगत आहे. पैशांच्या जोरावर ते कार्यकर्ते विकत घ्यायला निघाले असतील. अशी भाजपची मानसिकता आहे. भाजपनं महाराष्ट्राला ओळखलेलं नाही. सत्तेची एवढी गर्मी आणि मस्ती योग्य नाही, असे पटोले म्हणाले.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT