Parinay Fuke -Rahul Gandhi Sarkarnama
विदर्भ

Rahul Gandhi Vs BJP : राहुल गांधींनी महाराष्ट्रातील वाढीव मतांचा मुद्दा मांडताच भाजपची टीम लागली कामाला; विदर्भातील नेत्याने थेट वर्मावर बोट ठेवले

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस पक्ष ज्यावेळी निवडणूक जिंकतो, त्यावळी त्यांची भूमिका वेगळी असते. परंतु एखादी निवडणूक हरली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी ईव्हीएमवर, निवडणूक आयोगावर किंवा मतदार याद्यांवर खापर फोडतात.

Rajesh Charpe

Nagpur, 04 February : विधानसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव काँग्रेस पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. सुमारे ७० लाख वाढीव मते आली कुठून, असा त्यांचा सवाल आहे. निवडणूक आयोगानेही अद्याप त्याबाबत खुलासा केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसने वाढीव मतांचे गुपित शोधून काढण्यासाठी एक समिती तयार केली आहे. काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत वाढीव मतांकडे लक्ष वेधून या विरोधात देशपातळीवर आवाज उठवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर तेलंगणा विधानसभा आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात ईव्हीएमचा वाटा होता का?, असा सवाल माजी मंत्री आमदार परिणय फुके यांनी केला आहे.

काँग्रेस पक्ष ज्यावेळी निवडणूक जिंकतो, त्यावळी त्यांची भूमिका वेगळी असते. परंतु एखादी निवडणूक हरली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी ईव्हीएमवर, निवडणूक आयोगावर किंवा मतदार याद्यांवर खापर फोडतात. मुळात त्यांनी पराभवावर मंथन करण्यासाठी वेळ काढावा, असा सल्लाही आमदार परिणय फुके यांनी दिला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० लाख मतदार वाढल्याचा आरोप केला होता. त्याला सडेतोड उत्तर देताना आमदार डॉ. फुके यांनी राहुल गांधी यांना तेलंगणा आणि लोकसभेतील यशाची आठवण करून देत त्यावेळी ईव्हीएम चांगले होते का, असा सवालही फुके यांनी केला आहे.

तेलंगणा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरोप केला नाही. आता विधानसभेत महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारल्यानंतर लगेच ईव्हीएम, निवडणूक आयोग अन मतदार याद्यांवर आरोप करणे सुरू केले आहे. मुळात राहुल गांधी यांचे 'नाचना न जाने आंगण तेढा' असे सुरू आहे. त्यांनी आपल्या स्थानिक नेत्यांसोबत पराभवावर विचार, चिंतन करायला वेळ काढावा, असा खोचक सल्लाही डॉ. फुके यांनी दिला.

लोकसभेतील पराभवानंतर आम्ही एकत्रित बसून चुकांचा शोध घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा कुणीही ईव्हीएमवर आरोप केले नाहीत. आम्ही चिंतन केले, ज्या चुका झाल्या आहेत, त्या दुरुस्त करून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो. त्यामुळे आम्हाला मोठे यश मिळाले. निवडणुकीला सामोरे जाताना हीच प्रक्रिया होत असते. काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी कुठे चुकलो, याचा शोध घ्यावा अन्‌ हवेत इमले बांधणे सोडावे, असा टोलाही आमदार डॉ. परिणय फुके  यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT