Chandrapur
Chandrapur Sarkarnama
विदर्भ

सुरजागडच्या लोहप्रकल्पवाल्यांना समजवा, राष्ट्रवादी काॅंग्रेस भडकली...

संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सुरजागड लोकप्रकल्पाने परिसरातील हजारो लोकांचे कल्याण होईल, अशी अपेक्षा होती. पण आता हाच प्रकल्प नागरिकांच्या जिवावर बेतला आहे. अनियंत्रित वाहतूक, नशेखोर वाहनचालक, अन् प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरत आहे. सुरजागड प्रकल्पाने चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील अनेक तरुणांच्या वाट्याला अपंगत्व आणलेय. अनेकांची घर फुटली. मार्गावरील निवास्यांना कमालीची भिती आहे.

सुरजागड प्रकल्पवाल्यांनीच आता गोंडपिपरीवरून बायपास काढावा, नशेखोर वाहनचालकांची तपासणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा उपाध्यक्ष तथा गोंडपिपरीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल यांनी केली आहे. महिनाभरात यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे लोहप्रकल्प सुरू झाला. यामुळे आजूबाजूच्या मोठ्या भागातील परिसराला विकासाची चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. पण यातून केवळ बड्या हस्तींचेच भले होत आहे. मोठ्या वाहन उद्योजकांनी आपआपली अधिकाधिक वाहने येथे कामाला लावली आहेत.

काहींनी बड्या नेत्यांनी यासाठी आष्टी-गोंडपिपरी वर मोठ्या किमतीत जागाही विकत घेतल्या आहेत. पण सुरजागड वरून होणारी अनियंत्रित वाहतूक, नशेखोर वाहनचालकांचा वेगवान प्रवास नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून कमालीचे अपघात वाढले आहेत. वर्षभरात अनेक तरुणांना अपंगत्व आले आहे, तर काहींना आपला जिवही गमवावा लागला. सुरजागड प्रकल्पाचा सर्वाधिक फटका बसला असेल तर तो गोंडपिपरी तालुक्याला. आष्टीपासून गोंडपिपरीपर्यत या प्रकल्पाने अनेकांचे मोठे नुकसान झाले. काल गोंडपिपरी येथील आझाद हिंद चौकातील एका घरात सुरजागड प्रकल्पाचे वाहन घुसले. घर तुटले आणि वाहन चालकही दगावला.

नेहमीच होत असलेल्या या प्रकाराने आता संतापाची लाट आहे. अशा स्थितीत आता सुरजागडवाल्यांनी गोंडपिपरीतून बायपास काढावा, नशेखोर वाहन चालकांवर नियंत्रण ठेवावे व नागरिकांना नुकसान होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या. जिल्हाधिकारी साहेबांनी या गंभीर समस्यांबाबत सुरजागडवाल्यांना उपाययोजनांसाठी तंबी देऊन गोंडपिपरी तालुकावासीयांना या भयाण समस्येपासून वाचवावे. असे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आक्रमकपणे आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गोंडपिपरीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल यांनी दिला आहे.

सुरजागड प्रकल्पाचा मोठा फटका गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. तालुक्यातील अनेक तरुणांना अपंगत्व आलेले आहे. सुरजागडवाल्यांनी आता गोंडपिपरीतून बायपास काढावा व वाहनचालकांवर नियंत्रण कसे ठेवता येईल याचे नियोजन करावे. जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे जातीने लक्ष देऊन प्रकल्पाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना तंबी द्यावी.

- महेंद्रसिंह चंदेल, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT