Sanjay Raut and Devendra Fadanvis
Sanjay Raut and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

उपमुख्यमंत्री आहे, हे स्वीकारायला फडणवीसांचं मन अजूनही तयार नाही…

संजय डाफ

नागपूर : ४० आमदार गेले म्हणजे शिवसेना संपली, असं होत नाही. आम्ही पुन्हा आमदार निवडून आणू. आता ४० चे ८० होतील, तेवढी ताकद शिवसेनेमध्ये आहे. खासदारांच्या दबावामुळे राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला, असं बोललं जातंय, हे चूक आहे. यापूर्वीही प्रवाहाच्या विरोधात जाऊन आम्ही राष्ट्रपतींना पाठिंबा दिलेला आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज येथे म्हणाले.

आम्ही एनडीएच्या सरकारमध्ये असताना प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. तेव्हा कुणी बोललं का की, दबावाखाली पाठिंबा दिला म्हणून..? एनडीएमध्ये असतानाच कॉंग्रेसच्या (Congress) प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता. शेषनलाही आम्हीच पाठिंबा दिला होता. पक्ष नव्हे तर व्यक्ती बघून पाठिंबा द्यायचा, ही आमची परंपरा असल्याचे खासदार राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) महाराष्ट्राचे (Maharashtra) नेते आहेत. आम्ही एकत्र कामे केले आहे. पण ठीक आहे, चालतेच आहे, राजकारणात असे चढउतार येत असतात आणि फडणवीस त्याचा धीराने मुकाबला करतील. मूळ शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाबद्दल विचारले असता, हे गट वगैरे तुम्ही निर्माण केले आहेत. गट विधिमंडळामध्ये असू शकेल, काही खासदार इकडे-तिकडे काही बोलले असतील, बोलत असतील. पण शिवसेनेमध्ये कुठलाही गट नाहीये. शिवसेना (Shivsena) ही अजूनही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे.

उद्धव ठाकरे जी शिवसेना चालवत आहे, ती काही आमदार गेले आणि काही खासदार जाण्याच्या तयारीत आहेत. असं असलं म्हणून काही शिवसेना संपली असं होत नाही. त्यांच्यामध्ये गट आहेत, पण शिवसैनिकांमध्ये कुठलाही गट नाही. आमचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांसाठी केवळ एकच गट आहे, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा. आम्हा सगळ्यांची तीच भूमिका आहे. हे भविष्यात सर्वांना कळणारच आहे. शिवसेना खरी की खोटी हा प्रश्‍नच येत नाही. शिवसेना म्हणजे एकच आणि ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची. या देशात अशा कितीतरी सेना निर्माण झाल्या. पण राहिल्या दोनच सेना. त्या म्हणजे एक भारतीय सेना आणि एक शिवसेना, असे खासदार राऊत यांनी सांगितले.

याआधीचं सरकारसुद्धा लोकशाहीचं सरकार होतं, प्रचंड बहुमताचं सरकार होतं. बहुमताच्या सरकारने लोकहिताचे घेतलेले निर्णय ते बदलले जाताहेत. ही परंपरा चांगली नाही. उद्या पुन्हा आमचं सरकार येऊ शकतं. मग आम्ही तुमचे निर्णय बदलायचे का? जे निर्णय राज्याच्या हिताचे आहेत, ते केवळ विरोधासाठी विरोध म्हणून आणि राजकीय बदल्याच्या भावनेने बदलवणे हे राज्याला आणि देशाला परवडणारे नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी स्वतः स्वीकारलं आहे का की, ते उपमुख्यमंत्री आहेत म्हणून? त्यांच्या चेहऱ्यावरून, एकंदरीत बॉडी लॅंग्वेजवरून, त्यांच्या बोलण्यातून असं स्पष्ट जाणवतंय की, ते स्वतःला उपमुख्यमंत्री मानून घ्यायला अद्यापही तयार नाहीत. ते मनाने अजूनही मुख्यमंत्रीच आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांना या पदाचीच प्रतीक्षा होती आणि आताही आहे आणि माझी पूर्ण सहानुभूती त्यांच्यासोबत आहे, असा टोला खासदार राऊत यांनी फडणवीसांना हाणला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT