Devendra Fadanvis and Pravin Darekar, Tea at Waranga Fata.
Devendra Fadanvis and Pravin Darekar, Tea at Waranga Fata. Sarkarnama
विदर्भ

फडणवीस म्हणाले; सरकारला जाणीव व्हावी, यासाठी निघालो दौऱ्यावर...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर निघाले आहेत. आज त्यांनी वाशीम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांचा दौरा केला. उद्या लातूर आणि औरंगाबादचा दौरा ते करणार आहेत. सरकारला परिस्थितीची जाणीव व्हावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी आम्ही दौऱ्यावर निघालो आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम शिवणी रोड व मोझरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता, त्यांनी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व शेतकऱ्यांना शासनाशी बोलून ताबडतोब नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विरोधी पक्षाचे दोन्ही नेते मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले असता, त्यांनी मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड व मोझरी येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली.

आजचा दौरा हा प्रशासनाला जागं करण्यासाठी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, एक-दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही. शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचं आहे असं, मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी म्हटले की, अगोदरच अस्मानी संकटात आम्ही सापडलो असून, प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत येऊनही पाहिले नाही.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी येऊन बघतसुद्धा नाहीत तसेच, विमा कंपन्यांचे अधिकारी विमा देण्यासाठी आमच्याकडून पैशाची मागणी करतात, आम्ही जावे तरी कोणाकडे? असेही म्हणणे शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्या जवळ मांडले. यावेळी फडणवीस म्हणाले की, मी याबाबत आजच प्रशासनाशी बोलून तुमचा प्रश्न मार्गी लावतो व तत्काळ कारवाई व नुकसान भरपाई करण्यासंदर्भात चर्चा करतो. यावेळी त्यांच्यासोबत आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, राजू पाटील राजे, पुरुषोत्तम चितलांगे, रवींद्र ठाकरे, श्याम खोडे, सुनील मालपाणी, मोहम्मद शारीक, अनिल गावंडे उपस्थित होते. पाहणी करून दोन्ही नेते पुढील दौऱ्यावर निघून गेले. यानंतर त्यांनी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याचा दौरा केला.

मग ती मदत काय कामाची?

ओल्या दुष्काळामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा, स्थितीत शेतकऱ्यांना घरपोच मदत करावी जर, शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळाली नाही तर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. मग, ती मदत काय कामाची? सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत नाही, असेही यावेळी शेतकरी व पुणे बाजार समितीचे संचालक विठ्ठलराव गावंडे यांनी देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्याजवळ व्यक्त केली.

घेतला चहाचा आस्वाद..

देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा येथे चहाचा आस्वाद घेतला. वारंगा फाटा येथील चहा आणि खिचडी प्रसिद्ध आहे. आमदार होण्यापूर्वी या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबायचो, अशी आठवण यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चहा घेताना सहकाऱ्यांना सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT