Murtijapur
Murtijapur Sarkarnama
विदर्भ

Farmers' Agitation : सिबील नावाचे भूत मानगुटीवर, शेतकरी धडकले एसडीओ कार्यालयावर !

सरकारनामा ब्यूरो

Akola District Murtijapur Farmer's Agitation News : आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर शासनाने बसविलेल्या नव्या सिबील नावाच्या भुताच्या विरोधात शेतकरी जागर मंच च्या ‘मेरा गाव मेरी संसद’ अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व १४८ गावांमध्ये जनजागृती केल्यानंतर हजारो शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काल (ता. १ मे) दुपारी मूर्तिजापूर उप विभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. (Deputy Divisional Officer stormed the office)

शेतकरी जागर मंचचे अध्यक्ष प्रशांत गावंडे व जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांच्या नियोजनातील शासनाच्या सिबील धोरणाविरोधातील शेतकऱ्यांचा मोर्चा शेतकऱ्यांच्याच नेतृत्वात उप विभागीय कार्यालयावर धडकण्यापूर्वी सकाळी १० वाजल्यापासूनच तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने विश्रामगृहासमोरील मैदानावर एकत्रित यायला सुरुवात झाली.

पीक कर्जाला शेतकरी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे शासनाने बँका, वित्तीय महामंडळांच्या माध्यमातून तशी व्यवस्था करून ठेवली आहे. बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतरही राष्ट्रीयकृत बँकांना शेतीसाठीच्या कर्ज प्राधान्याच्या सूत्रात बांधून ठेवले. यापूर्वीच्या शासनाने शेतीचे पतधोरण आखताना शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेऊन जाचक अटींमधून सूट दिली; मात्र आता शासनाने सिबीलचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसविण्याचे निश्चित केले आहे.

सिबील म्हणजे कर्जासाठी पात्र होण्याकरिता गुण मिळविणे. हे गुणांकन ९०० पैकी किमान ७२० असणे आवश्यक आहे. कर्ज थकीत असणे, कर्जाचे हप्ते नियमित न भरणे, वन टाइम सेटलमेंट अंतर्गत कर्ज भरणा करणे, यापूर्वी कधीही कर्ज न घेणे, अशा कारणांमुळे गुणांकन ७२० पेक्षा जास्त होऊ शकत नाही.

ही वस्तुस्थिती यावेळी माजी आमदार ((MLA) ॲड. भैयासाहेब तिडके, शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक डॉ. श्रीकांत तिडके, व्याख्याते अक्षय राऊत, प्रशांत गावंडे, सम्राट डोंगरदिवे, अरविंद तायडे, श्रीकृष्ण बोळे, जगदीश मुरूमकार, मंगेश कुकडे, राजू वानखडे, भवनसुंदर वानखडे, यशस्वी गावंडे, नेहा उमक यांनी विशद केली.

ही नवीन प्रणाली शेतकऱ्यांसाठी अडचणीची, जाचक व त्रासदायक आहे, असे सांगून शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून पुढे करण्यात आलेली सिबीलची अट शेतकऱ्यांना शेती विकायला भाग पाडणारी आहे व तसे आम्ही होऊ देणार नसल्याचेही यावेळी निक्षून सांगण्यात आले.

बैलबंड्यांसह शेतकऱ्यांचा विराट मोर्चा शिवछत्रपती (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात शिवरायांना व डॉ. आंबेडकर चौकात बाबासाहेबांना अभिवादन करून एसडीओ कार्यालयावर पोचला. पक्ष नाही, राजकीय अजेंडा नाही फक्त आमच्या बापाच्या (शेतकरी) फॅक्टरी (शेती) वर लक्ष असणाऱ्या सरकारला आम्ही जाब विचारत आहोत, अशा आशयाचे निवेदन एसडीओ (SDO) संदीप अपार यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर येऊन शेतकऱ्यांकडून स्वीकारले व वरिष्ठांपर्यंत शेतकऱ्यांची कैफियत पोचविण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

सुमारे १२०० शेतकरी या मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते व शासकीय (State Government) धोरणाविरोधी चीड व्यक्त केली. सर्व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी (Farmers) एसडीओंना निवेदन दिल्यानंतर आपापल्या घरून कापडात गुंडाळून आणलेल्या शिदोरीचा आस्वाद तहसील परिसरात घेतला. मोर्चा तीन-तीन शेतकऱ्यांच्या रांगेत शिस्तीने निघाला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT