Ravikant Tupkar On Call With Manoj Jarange Patil. Sarkarnama
विदर्भ

Buldhana Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसह मंत्रालयाकडं कूच, मनोज जरांगेंचाही फोन

जयेश विनायकराव गावंडे

On Way To Mantralaya : कापूस व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा, तसेच शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे, या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर मुंबईतील मंत्रालयाकडं रवाना झाले आहेत. त्यांच्यासह शेतकऱ्यांचा मोठा ताफाही आहे.

बुधवारी (ता. 29) तुपकर यांनी शेतकऱ्यांसह मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा दिला आहे. पत्नी शर्वरी आणि सोमठाण्यातील महिलांनी तुपकर यांना मुंबईला रवाना होण्यापूर्वी औक्षण केलं. तुपकर यांची कन्या यज्ञता हिनेही आपल्या वडिलांना बळ दिलं. त्यानंतर शेतकऱ्यांचा ताफा मुंबईकडं रवाना झाला. (Farmer's Leader Ravikant Tupkar Left Towards Mumbai Mantralaya From Somthana Village Of Buldhana)

मराठा आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी तुपकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मराठा समाजाकडूनही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं जरांगे यांनी या वेळी सांगितलं. गरज भासल्यास आपणही आंदोलनात सहभागी होऊ, असं जरांगे या वेळी म्हणाले. अन्नत्याग आंदोलनामुळं तुपकर यांचा रक्तदाब व साखरेचे प्रमाण घटलं आहे. किडनीवरही सूज आली आहे. त्यामुळं डॉक्टरांनी त्यांना प्रवास न करण्याचा किंवा अन्नत्याग सोडण्याचा सल्ला दिला होता.

मुंबईच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी तुपकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारनं आम्हाला मंत्रालयात येऊ द्यावं. आधीच शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. आता ती वेळ गेली आहे. शेतकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न कुणी केल्यास प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील. आपल्याला न्यायालयानं जामीन दिला आहे. त्यामुळं पोलिस आपल्याला पुन्हा अटक करू शकत नाहीत. असं झालं तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असंही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोमठाण येथुू निघाल्यानंतर तुपकर बुलडाणा शहरात पोहोचले. छत्रपती संभाजीनगर, नगर, चाकणमार्गे लोणावळा येथे तुपकर व त्यांच्यासोबत असलेले शेतकरी पोहोचतील. लोणावळा येथे त्यांचा रात्री मुक्काम राहणार आहे. बुधवारी सकाळी तुपकर शेतकऱ्यांसमवेत मुंबईतील मंत्रालयाकडे रवाना होतील. तुपकर यांच्या आंदोलनाला आतापर्यंत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतून शेतकरी ऐनवेळी मुंबईतील मंत्रालयात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर हे मुंबईकडं रवाना झाल्याची माहिती नियमाप्रमाणं बुलडाणा पोलिसांनी अमरावती येथील परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक (DIG) कार्यालयाला कळविली आहे. आंदोलन मराठवाडामार्गे मुंबईकडं जाणार आहेत. तुपकर यांच्यासमवेत किती संख्येत शेतकरी आहेत, याची माहितीही देण्यात आली आहे. अमरावती येथील डीआयजी पोलिस नियंत्रण कक्षानं याबाबत मुंबईतील पोलिस महासंचालकांच्या नियंत्रण कक्षाला (DG Control Room) देखील कळविले आहे. तुपकर यांचा ताफा ज्या मार्गानं जाईल, त्यावर पोलिसांची नजर राहणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT