Farmers In Front of MLA Vijay Agrawal's House. Sarkarnama
विदर्भ

Gondia Farmer's Andolan: रात्रभर आमदारांच्या घरासमोरच झोपले शेतकरी, पाच कोटी ७२ लाख रुपये मिळणार?

Farmers Slept In Front Of MLA's House: चुकारे द्या, तरच आंदोलन मागे घेऊ, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

सरकारनामा ब्यूरो

Gondia District's Farmer's Agitation News : चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने खरीप हंगामाचे धान शेतकऱ्यांकडून खरेदी केले. विक्री केलेल्या धानाचे पाच कोटी ७२ लाख रुपये अद्याप मिळाले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर काल (ता. २८) सकाळी ११ वाजतापासून ठिय्या आंदोलन सुरू केले. (agitation started from 11 am)

चुकारे द्या, तरच आंदोलन मागे घेऊ, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेत अख्खी रात्र आंदोलनस्थळी काढली. आज (ता. २९) दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. जिल्हा पणन कार्यालयाने तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव धान खरेदी संस्थेला शासकीय धान खरेदी करण्याची परवानगी दिली. त्यामुळे या केंद्रावर चुटियासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जून महिन्यात उन्हाळी अर्थात रब्बी हंगामातील हजारो क्विंटल धान विकले.

विक्री केलेल्या धानाची रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र, अडीच ते तीन महिने लोटूनही रक्कम जमा झाली नाही. संस्थेच्या गोदामात खरेदी केलेला धान उपलब्ध नसल्याने रक्कम थांबविण्यात आल्याचे जिल्हा पणन कार्यालयाकडून सांगितले जाते. तथापि, जिल्हा प्रशासनाने नियमानुसार, या संस्थेवर कारवाई करणे अपेक्षित असताना उलट शेतकऱ्यांचे चुकारे अडविले गेले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

या केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे जवळपास पाच कोटी ७२ लाख रुपये अडवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तथापि, प्रशासकीय यंत्रणेच्या पायऱ्या झिजवूनही चुकारे मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २८) थेट आमदार विनोद अग्रवाल यांचे जनसंपर्क कार्यालय गाठले आणि ठिय्या मांडला.

दिवसभरात सहायक पणन अधिकारी, गोंदिया ग्रामीणचे तहसीलदार यांनीही शेतकऱ्यांशी चर्चा केली. पण शेतकऱ्यांनी चुकारे मिळाल्याशिवाय आंदोलनस्थळाहून हटणार नाही, असा पवित्रा घेतल्याने त्यांना रात्र आंदोलनस्थळीच काढावी लागली.

मंत्रालयात तातडीची बैठक..

चुटीया येथील संस्थेतील धान घोटाळा लक्षात घेता पणन विभागाने त्या संस्थेत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अडविले. धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग कार्यालयात उंबरठे झिजवले. मात्र, आश्वासनाच्या पलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. दरम्यान, सोमवारपासून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी याबाबत खासदार प्रफुल्ल पटेल यांना माहिती दिली.

खासदार पटेल (Prafull Patel) यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून यावर त्वरित निर्णय घ्यावा, यासंबंधी चर्चा केली. यामुळे आज (ता. २९) मंत्रालयात (Mantralaya) या विषयावर तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात चुकारे त्वरित जमा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे माजी आमदार जैन यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT