RTO Nagpur
RTO Nagpur Sarkarnama
विदर्भ

RTO : नागपुरात थंडावले आरटीओचे वायुवेग पथक; ट्रॅव्हल्सवाल्यांची मुजोरी वाढली !

Atul Mehere

नागपूर : गेल्या महिन्यात नाशिकमध्ये (Nasik) ट्रॅव्हल्स पेटून ११ प्रवासी मरण पावले होते. त्यानंतर ट्रॅव्हल्सच्या फिटनेसचा मुद्दा उपस्थित झाला होता. काही दिवस चौकश्‍यांची नौटंकी चालली. आरटीओकडून फिटनेसच्या तपासण्या थातूरमातूर झाल्या. आता पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे. नागपुरात (Nagpur) आरटीओचे (RTO) वायुवेग पथक थंडे पडले आहे. परिणामी ट्रॅव्हल्सवाल्यांची मुजोरी वाढली आहे. याचा प्रचंड त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.

शहरात खासगी बसेसची संख्या प्रचंड वाढली आहे. सोबतच वाहतुकीचे नियमही पायदळी तुडवत असून ते मुजोरी करीत वाहने रस्त्यात वाहने उभी करतात. यामुळे वर्दळीच्या आणि अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. याकडे वाहतूक पोलिस (Trafric Police) दुर्लक्ष करीत आहेत. केवळ सामान्यांकडून दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिस आहेत का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. गणेशपेठ, घाटरोड, बैद्यनाथ चौक, आग्याराम देवी चौक हा ट्रॅव्हल्स (Travels) चालकांचा पूर्वीपासून अड्डा बनला आहे. तरी इतर रस्त्यांवरसुद्धा प्रवाशांच्या शोधात वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे.

आधीच शहरात कार व दुचाकींची संख्या वाढल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. धंतोलीतील यशवंत स्टेडियम, सीताबर्डी टेकडी परिसर, इमामवाडा, छत्रपती चौक, बोले पेट्रोल पंप परिसर, सक्करदरा, गणेश टेकडी मंदिर परिसर अशा शहरातील अनेक गजबजलेल्या भागात रस्त्यात ट्रॅव्हल्स उभ्या असतात. प्रवासी भरेपर्यंत बराच वेळ वाहने उभी असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी होत असल्याने एसटी बस, आपली बस, कार आणि दुचाकी अडकून पडतात. बहुतांश वेळा ॲम्बुलन्सलासुद्धा मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते.

वाहतूक विभागाचेही ट्रॅव्हल्सवाल्यांना अभय..

रस्त्यावर खासगी बसेस उभ्या केले जातात. कोंडीं होत असताना पोलिसांची वाहने कोंडीतून मार्गक्रमण करतात. वाहतूक पोलिसांसमोर हा प्रकार होतो. सामान्य नागरिक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करूनही पोलिस विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिसांच्या नाकावर टिच्चून ट्रॅव्हल्सवाले मुजोरीने वाहने उभी करतात. टोळीत असलेल्या ट्रॅव्हल्सवाल्यांना सामान्य वाहनचालकांनी वाहतूक कोंडीबाबत हटकले असता त्यांच्यावर तुटून पडतात. त्यामुळे सामान्य व्यक्ती बोलण्यास धजावत नाही. कारवाई होत नसल्याने ‘अर्थ’पूर्ण संबंधातून वाहतूक पोलिस विभागाचे ट्रॅव्हल्सवाल्यांना अभय मिळत आहे का? वाहतूक पोलिस केवळ सामान्यांवर चालान फाडून दंड वसुलीसाठी आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून होऊ लागला आहे.

रस्त्यावर खासगी बसेस उभ्या राहत असल्याने वाहतूक करताना प्रचंड त्रास होतो. कार्यालयात जाताना घाई असते. नेमक्या अशाच वेळी वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी सामान्य लोकांची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT