Eknath Shinde and Gajanan Kirtikar
Eknath Shinde and Gajanan Kirtikar Sarkarnama
विदर्भ

गजानन किर्तीकर यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला आणि महाराष्ट्राला होईल…

Atul Mehere

नागपूर : भंडाऱ्यामध्ये विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आहे. आज कार्यकर्त्यांना भेटणार आहे. सरकार शासनाच्या कामांना गती आणि चालना देण्याचं काम करत आहे, त्याचाच एक भाग म्हणून भंडाऱ्यातील लोकाभिमुख विकासाची काम सुरू करतोय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचे आज सकाळी नागपुरात (Nagpur) आगमन झाले. येथून ते भंडारा येथे विविध कार्यक्रमांसाठी रवाना झाले. त्यापूर्वी विमानतळावर (Nagpur Airport) पत्रकारांशी ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मॉलमध्ये मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. यासंदर्भात विचारले असता जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी जी कारवाई केली, ती कायदेशीर आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, असे ते म्हणाले. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रश्‍नावर ‘संजय राऊत मोठे नेते आहेत...’, येवढेच बोलून त्यांनी हा विषय संपवला.

ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश घेतला. यासंदर्भात काल गजानन कीर्तीकर आमच्याकडे आलेत. एक वरिष्ठ नेते खासदार आमच्याकडे आले त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, त्यांचं मार्गदर्शन, त्याच्या कामाचा अनुभव याचा फायदा आम्हाला आणि महाराष्ट्राला होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. गजानन किर्तीकर यांच्यासारखे नेते उद्धव ठाकरेंना सोडून जाणे हा उद्धव गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यापासून ते उद्धव ठाकरे गटाला सातत्याने हादरे देत आहेत. त्यातील हा मोठा धक्का मानला जात आहे.

प्रकल्प म्हणजे जादूची कांडी नाही..

आमचं सरकार हे विकास कामांना प्राधान्य देते. अडीच वर्षात जी कामं प्रलंबित होती त्यांना चालना देण्याचे काम गेल्या तीन चार महिन्यांत करतोय. विकासाभिमुख हे सरकार आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास करणे, यावर आमचा फोकस आहे आणि जे प्रकल्प थांबले आहेत. त्यांना पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. कुठलाही प्रकल्प असा तीन-चार महिन्यात येतो आणि जातो, असं होत नाही, जादूची कांडी नाही की इकडून आला आणि तिकडे गेला. आरोप करायचं तर कोणीही करू शकतो, मात्र आमचं जे सरकार आहे, ते उद्योगांना चालना देणार आहे.

नजीकच्या काळात आपल्याला दिसेल आणि गेल्या चार महिन्यात काय केलं आणि अडीच वर्षात त्यांनी काय केलं हेही दिसेल आणि भविष्यामध्ये जे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहेत तेसुद्धा आपल्याला दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला आश्वस्त केलं आहे की या राज्यात मोठे उद्योग आणि रोजगार निर्मिती करू. मी प्रधानमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो की दोन हजार कोटी रुपये आम्हाला दिले. त्यामुळे विकासाभिमुख सरकार आहे. आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करणार आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT